Wednesday, November 14, 2007

अंतीम युद्ध - भाग १०

आणि तो दिवस उजाडला! सगळ्यांच्या मनात एक विचित्र हुरहुर होती. प्रयोगाच्या यशस्वितेविषयी सगळ्यांच्याच मनात थोडीफार साशंकता होती.
निवडक १०,००० जणांना या चांचणी साठी निवडण्यात आले होते. त्यात सर्व थरातील लोक होते. शास्त्रज्ञ, कवी, डॉक्टर, चित्रकार, विद्यार्थी..
एकेक करुन सर्वजण शांतपणे निती डोम च्या पायर्‍या उतरत होते. पृथ्वी वर एकाच वेळी तीन ठिकाणी हा प्रयोग सुरू होणार होता.
त्यासाठी येणार्‍या संभाव्य धोक्याची चाचपणी करून भव्य डोम समुद्र तळाशी बांधण्यात आले होते. आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात आली होती..पृथ्वीच्या या भावी नागरिकांना बाहेर असलेल्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
विरीता ने केवल ला जवळ घेवून म्हटले , " केवल, असं जाणीव पूर्वक आणि समजून आई मुलाचं वेगळं होणं किती कष्टप्रद आहे...किती कठीण! आपण पुन्हा भेटणार नाही केवल...कधीही.. पण त्या उज्ज्वल दिवसासाठी केलेले प्रयत्न - परिश्रम, घेतलेला ध्यास आणि पाहिलेली स्वप्नं तर चिरंतन आहेत...
मृत्यू म्हणजे वियोगाचंच दुसरं नाव आहे नं...पण हा वियोग किती उभारी देणारा, भारणारा आहे! पुढल्या अनेक पिढ्यांच्या भवितव्याची शाश्वती देणारा, पृथ्वीच्या पुनरुत्थानाची ग्वाही देणारा, सकारात्मक वियोग!...तिला पुढे बोलवेना. तिने चेहेरा हाताने झाकून घेतला.

केवल ने आजूबाजूला नजर टाकली. धुरकट आकाशातून दिसणार्‍या फिक्या पण विलोभनीय बुडत्या सूर्यबिंबाकडे नजर भरून पाहिले व तो डोमच्या पायर्‍या उतरु लागला.

केवल हा या प्रयोगात सहभागी होणारा शेवटचाच उमेदवार होता. त्यानंतर डोम चा भव्य दरवाजा बंद करण्यात आला.
जरुर ती सर्व कागद्पत्रं, आयडेंटिटी मार्क्स, खुणा, हिस्टरी प्रत्येकाच्या हिल्चिप मध्ये स्टोअर करुन ठेवण्यात आली होती. तसेच इतक्या दीर्घ निद्रेतून उठल्या नंतर, जर कुणाची पूर्णच स्मृती हरपली तर त्याची सर्व फाईल ही जवळ ठेवण्यात आली होती.

डॉ लेक्शॉ यांनी त्यांच्या २ मदतनिसांद्वारे प्रत्येकाला चीर निद्रेचं इंजेक्शन टोचायला सुरुवात केली तेव्हा रात्रीचे ९ वाजले होते.
काम पूर्ण होवून ते बाहेर आले तेव्हा जवळ जवळ १२ तास उलटून गेले होते. मिसेस लेकशॉंनी त्यांचा हात घट्ट धरुन ठेवला ..त्यांच्या नजरेत अनेक उदास प्रश्नं होते. शेखरने आईला थोपटून धीर देण्याचा प्रयत्न केला.

काम पूर्ण झाल्याची खात्री पटताच निदांनी अतीव समाधानाने दार लॉक केलं आणि ते आपल्या अभ्यासिकेत परतले. आता पुढची कृती अधिक महत्त्वाची आणि जिकीरीची होती.........

Friday, October 05, 2007

अंतीम युद्ध - भाग ९

दहा महिन्यांच्या अविश्रांत परिश्रमांनंतर प्रोजेक्ट ची रुपरेषा तयार झाली. सद्ध्या उपलब्ध असलेले अद्ययावत तंत्रज्ञान व उर्जा कार्बन सायकल च्या उलट प्रक्रियेस पुरेसे आहेत यावर कुणाचेच दुमत नव्हते.
फक्त त्यामुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता, स्फोट, वावटळी मानव कितपत साहू शकतील हाच मुद्दा होता. त्यासाठी चीर निद्रेचा पर्याय सुचविण्यात आला होता.
खोल समुद्राच्या तळाशी मोठी विवरं बांधून त्यात चीर निद्रे साठी झोपून जायचे...बाहेरच्या घडामोडींशी अनभिज्ञ.....

दृष्य बदल:
केवल चा चेहेरा विमनस्क होता. "पण का, आजी-आज्जो आणि आई तू सुद्धा.... सहभागी होता येणार नाही म्हणजे काय? या उपक्रमाचे आपण च तर उद्गाते आहोत...आणि आता तुम्हीच अशी कच खाल तर कसं होणार?" तो मोजून नवव्यांदा विरिता ला म्हणाला.
"नाही रे, कच खाण्याचा प्रश्नच नाही...आणि आमचा तुझ्यावर, तुझ्या सद्सद विवेक बुद्धी वर पूर्ण विश्वास आहे. पण आम्ही मात्र इथेच रहायचा निर्णय घेतला आहे. भावी पिढ्यांना उगवती ची दारे खुली करुन देतांनाच, आम्हाला मात्र या संहाराचे साक्षीदार व्हायला आवडेल. हा तरी एक अनुभवच आहे नं , केवल..
पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज काही जणांनी तरी त्याग सोसायलाच हवा, आजपर्यंतच्या आपल्या बेलगाम वागण्याचे क्षालन म्हण हवे तर. या बलीदानामुळे तुम्हाला मिळाल्याच तर काही गुड विल्स मिळोत." विरीता त्याला समजावत म्हणाली.

केवल ला काही ते फार पटलेले दिसले नाही.

वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळे प्रयत्न चालू होते. पद्मनाभ यांनी एका विश्व प्रार्थनेचे आयोजन केले होते. शिखर व त्याच्या ग्रुप ने जन जागरणाची व्यापक मोहीम आखली होती. विशेषतः लहान मुले डोळ्यापुढे ठेवून त्यांचे जागृतीचे काम चालले होते.

आधुनिक संपर्क साधनांमुळे जग अगदीच जवळ आले होते. त्यांमुळे बर्‍याच गोष्टी सुलभ झाल्या होत्या. अर्थात मानवी स्वभावाच्या अनेक कंगोर्‍यांचा प्रश्न होताच. प्रत्येकाच्या वेगळ्या शंका आणि त्यांचे निरसन करण्यानेच शिखर-विरीता थकून गेले होते.

Thursday, October 04, 2007

अंतीम युद्ध - भाग ८

डॉ लेकशॉ मात्र केवल च्या प्रतिवादाने प्रभावित झालेले दिसत होते. "माझा फक्त शास्त्रिय सत्यांवर विश्वास आहे. शाबित करण्यात आलेली आणि विश्वसनीय अशी शुद्ध सत्यं!
आपल्या राष्ट्रीय संरक्षण समितीच्या सदस्यांनाही मी हेच उत्तर दिले असते. बाकी मी काही जाणत नाही. किंबहुना तो माझा प्रांत नाही असे मी मानतो. पण तरीही,थोडे माझ्या मताबाहेर जाऊन, मी संरक्षण समितीलाही यावर विचार करायला भाग पाडेन. मी आपले सर्व संशोधन आणि निष्कर्ष तुम्हाला वापरायला देऊ शकतो.. त्याबद्दल हवी ती सर्व मदत मी करायला तयार आहे.

निदांच्या चेहेर्‍यावर मंद स्मित उमटलं...

एक पाऊल पुढे पडलं होतं!



डॉ लेकशॉंच्या अथक युक्तीवादावर अखेर संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षण समितीने ही मान तुकवली. मिशन नॅनो स्पिटिकल रद्द करण्यात येऊन त्याऐवजी ऑपरेशन सेव्ह अवर प्लॅनेट ची योजना कार्यन्वित झाली.

पुढचे चारपाच महीने केवल ला अजिबात उसंत नव्हती. बरेच मुद्दे विचारात घ्यायचे होते,अनेक बैठका घ्यायच्या होत्या आणि अनेकांच्या गळी ही कार्बन सायकल रिव्हर्सल ची कल्पना उतरवायची होती.

"केवल...कुठे इतका गुंतून राहीलायस? मला दिवस दिवस साधा ट्रॅकही करत नाहीस तू हल्ली. आपले हे आयुष्यही मोलाचे नाही का? पृथ्वीचे भले करण्याच्या या नादात तू सगळं जीवनच पणाला लावतो आहेस." निलोफर हिरमुसली होती.
"अगं, जगलो वाचलोच या प्रकल्पानंतर, तर मग आहोतच की, मला तू न तुला मी. पण आता हे फार महत्त्वाचं आहे, निलो. पृथ्वीचं आणि पर्यायाने संपूर्ण मानवजातीचं भवितव्य पणाला लागणार आहे. मला माहीती नाही आपल्याला हे करण्याचा अधिकार आहे किंवा नाही.
वाईटाबरोबर चांगलेही नको जळून जायला. कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाकारायची यात फार वाद होऊ शकतात. साधारणपणे अडीचशे-तीनशे वर्षे आपल्याला प्रदीर्घ झोप घ्यावी लागेल ...आणि प्रयोग यशस्वी झालाच तर मग आपल्याला उगवतीचे रक्तीम सूर्यबिंब पहायची संधी मिळू शकेल त्यानंतर.." केवल स्वप्नाळू डोळ्यांनी म्हणाला.

Saturday, September 29, 2007

अंतीम युद्ध - पुढचा भाग

पेच मोठा होता.. उत्तरे सहज नव्हती.
केवल ने निदांशी संपर्क साधला तेव्हा ते काही आकडेमोड करण्यात व्यस्त होते.
"सर, माझ्याकडे काही महत्वाची निरीक्षणे आहेत, काही निष्कर्षही आहेत. मला तातडीने आपला कायम स्वरूपी सभासद करुन घ्या. हे फार आवश्यक आहे, निकडीचंही आहे....वेळ ही फार कमी आहे आपल्याकडे , सर" त्याने आग्रही सुरात प्रतिपादले.
त्याच्या स्वरातील सच्चाई व कळकळ निदांना जाणवली असावी. तसेही ते अंतर्मनाची ग्वाही अधिक महत्वाची मानणार्‍यांपैकी होतेच. तरीही त्यांनी त्यांच्या जवळील छोट्या उपकरणाद्वारे केवल च्या रिक्वेस्ट ची ऑनेस्टी व ट्रस्ट तपासून बघीतली.
ती पुरेशी आढळताच त्यांनी लगेच ऑनलाईन सूचना देवून, त्याला उर्वरीत राईट्स देण्याची व्यवस्था केली.

दृष्य बदल :
"मिशन अर्थ" च्या छोटेखानी मिटींग रुम मध्ये अतिशय गोपनीय व फक्त अती विशिष्ट सभासदांची बैठक चालू होती.
निदां च्या विशेष विनंतीला मान देउन आज डॉ लेकशॉ उपस्थित होते.
"पण हे फार अवघड आहे, केवल, अशक्य कोटीतलंच म्हणता येईल असं..." डॉ लेकशॉंच्या स्वरात अविश्वास होता.
"पण आपण त्याची शक्याशक्यता पडताळून पहायला काय हरकत आहे? मला तरी तो एकमेव पर्याय दिसतो आहे. आपल्या नैतीकतेच्या आग्रहाशी, वैश्विक आणि पार्थिव भूमिकेशी सुसंगत असणारा एकमेव पर्याय!

केवल समर्थनार्थ उदगारला. "ही फक्त एक संकल्पना आहे. प्राथमिक स्वरुपात. आत्ता आपल्याकडे उपलब्ध असलेले रिसोर्सेस, उर्जा आणि तंत्रज्ञान, जे की आपण नॅनो स्पिटीकल वर जाण्यासठी वापरणार आहोत, तेच वापरुन, जर, कार्बन सायकल उलटी करण्याची प्रक्रिया सुरु करता आली..."

केवल च्या या प्रस्तावावर सारेच एकदम स्तब्ध झाले. त्याच्या शक्याशक्यतेची पडताळणी तेथे असणारे सारेच मनातल्या मनात करत होते.
"हे एक अंतीम युद्ध आहे...निकराचा प्रतिवाद...मानवाच्या लोप पावत जाणार्‍या संवेदनशीलतेचा अखेरचा यत्न.. याचे यशापयश कुणा एकाची मक्तेदारी नसेल. आपल्याला जगातील श्रेष्ठ शास्त्रज्ञांची मते आजमावी लागतील, अनेकांचे सल्ले घ्यावे लागतील, आणि त्यानुसार,.. ठरवावे लागेल.."
निदांनी संयत पणे सभेची सूत्रे हाती घेतली. "केवल, हीच कल्पना गेले कित्येक दिवस माझ्याही मनात घोळते आहे, पण मला ती फारशी अनुकूल वाटत नाही." त्यांनी प्रांजळपणे कबूल केले.

Friday, September 28, 2007

अंतीम युद्ध- भाग ७

विरीता विचारमग्न अवस्थेत बसून होती. मानवी स्वभाव हा सर्वाधिक अभ्यासाचा आणि गुंतागुंतीचा विषय आहे हे तिचे जुनेच मत होते. "इतका काळ लोटला, इतक्या पिढ्या उलटल्या, तरिही, आपण त्याच त्या चुका पुनः पुनः करत राहतो.
जुन्या पिढीला कालबाह्य ठरवून, स्वतःला अधिक सक्षम,हुशार ठरवत आपण आपलं घोडं दामटत राहतो..आणि चुकत जातो. .अगदी र्‍हासाची, सर्वनाशाची वेळ आली तरी!" तिला वाटले.
तिच्या या तत्वज्ञानात्मक चिंतनाला कारणही तसेच होते.

केवलने नुकतेच "चीरनिद्रा" या विषया वर तिचे बौद्धिक घेतले होते. अनेक दिवस, अनेक वर्षे...झोपून रहायचे. शांत....फ़क्त श्वासोश्वास चालू म्हणून जिवंत म्हणायचे. बाहेरच्या घडामोडींशी अनभिज्ञ! आधी प्रोग्रॅम करुन झोपेची मुदत ठरवून ठेवायची. काळ जणू गोठवून ठेवायचा...आपल्यापुरता.

"कुठे जाणार आहोत आपण एक दिवस कोण जाणे..." ती हतबुद्ध होऊन उद्गारली. "पण पर्याय शोधण्यापलिकडे आपल्या हातात आहे तरी काय! तेच तर करत आलोय वर्षानुवर्षे.." तिला वाटले.


तिकडे केवल त्याच्या स्वतंत्र अभ्यासिकेत इंटेलिवर्क वर माहिती मिळविण्यात, ती तपासून पाहाण्यात गुंग झाला होता.
तो ज्या दिशेने विचार करीत होता त्या विषयाचा मूळ गाभाच तर तो होता. "रिव्हर्सल ऑफ़ कार्बन सायकल!...त्याला लागणारी प्रचंड उर्जा, प्रस्तावित गुंतागुंतीच्या साखळी प्रक्रियेतून निर्माण होणारी उष्णता, लागणारे तंत्रज्ञान,
त्याचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव...आणि त्याचे सुदीर्घ फायदे!"

Friday, September 07, 2007

अंतिम युद्ध -भाग ६

ते परत वडुर्‍याला परतले तेव्हाही केवल विचारमग्न होता. "काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत, निलो. आमूलाग्र बदलाची नितांत आवश्यकता आहे. विचारांत आणि त्या अनुषंगाने घडणार्‍या कृतींत.
या सर्वाला आज्जोंचे (डॉ. लेकशॉ त्याचे लाडके आज्जो होते!) संशोधन कसं अप्लाय करता येईल, याचा मी विचार करतो आहे. कारण आधुनिक साधनांची मदत घेतल्याखेरीज हे शक्य होणार नाही असे माझे मत होत चालले आहे.

त्यांचा नॅनो स्पिटिकल चा अभ्यास, चीरनिद्रा ड्रग, साधन सामुग्री विषय़ीचे त्यांचे संशोधन, ऑक्सिजन वरचा त्यांचा महत्वपूर्ण व्यासंग..या सर्वांचीच आपल्याला गरज भासणार आहे, मिशन अर्थ करता सुद्धा!
अत्यंत काळजी पूर्वक विचार करून आपल्याला ठरवावं लागेल." तो निलो ला उद्देशून पण स्वतःशीच बोलल्यासारखं म्हणाला. "हो...मी उद्याच लायब्ररीत जाऊन जरा पुस्तकं धूंडाळते." निलोही गंभीर पणे उद्गारली.



दुसरा दिवस:
सर्वत्र अत्याधुनिक सरफ़ेस स्क्रीन्स लावलेल्या भव्य ई-वाचनालयात केवल आणि निलो शिरले तेव्हा दुपारचा एक वाजत होता. निलो ने आपला पासवर्ड दिल्यावर बरेच सेक्शन्स तिच्यासाठी खुले झाले. केवल ने टेक्नॉलॉजी तर निलो ने इतिहास असे ऑप्शन्स देवून पुस्तके ब्राऊजिंग करायला सुरुवात केली. बराच वेळ ते वाचनात गढून गेले होते.

निलोने वारंवार चेहेर्‍यावर येणार्‍या तिच्या डार्क ब्राऊन केसांच्या बटा डाव्या हाताने मागे ओढून धरल्या ती खुर्चीत थोडी रेलून बसली. अजिबात काळजी न घेताही दिसणार्‍या तिच्या अतिशय देखण्या, उत्फुल्ल चर्येकडे केवलचे लक्षच नव्हते.
त्याच्या कडे तिने अपेक्षेने पाहीले पण तो वाचनात आणि विचारांत इतका गढून गेला होता की तिच्या त्या मृदूल अपेक्षेची गंधवार्ताही त्याला मिळाली नाही
ती मनाशीच किंचीत हसली आणि तिने पुढे वाचायला सुरुवात केली. अचानक तिचे डोळे लकाकले.. तिने तो परिच्छेद पुन्हा वाचायला सुरुवात केली.

"स्थलांतर करणे हा एकमेव मार्ग नाही आणि इंटेलिजंट स्पेसिस टिकू शकते, एव्हढेच नाही तर या पृथ्वीला पुन्हा सुजलाम सुफलाम करणे शक्य आहे हे मानणारा एक शास्त्रज्ञ ४३५० च्या सुमारास होऊन गेला. त्याचे नाव होते व्हिलोकोविस सिंगनिझी. परग्रहावर जाण्यासाठी आणि प्रस्थापित होण्यासाठी जे तंत्रज्ञान, उर्जा आणि शस्त्रास्त्रे लागणार आहेत, तीच वापरून कार्बन सायकल रिव्हर्स करता येईल हे व्हिलोकोविसने सिद्ध केले. मात्रं व्हिलोकोविसचा पर्याय अशक्य म्हणून फेटाळून लावण्यात आला. खरे म्हणजे ऑक्सिजनविरहित वातावरणात लागणारी साधन सामुग्री तयार करणार्‍या कंपन्यांनी व्हिलोकोविसच्या पर्यायाला पराभूत केले."

....निलो अचाम्बित होऊन व्हिलोकोविस सिंगनिझी बद्दल वचत होती. त्याचे काळाच्या पुढचे विचार, धरती चे रक्षण व संवर्धन यांविषयीची त्याची आत्यंतिक तळमळ, तंत्रज्ञानाचा त्याचा अभ्यास...सारेच विलक्षण होते.

"केवल....हे..हे वाच!" तिने त्याला हलवले.

Tuesday, August 28, 2007

अंतीम युद्ध- भाग ५

निती डोम मध्ये प्रत्येक सीट इंटेलिवर्क ला कनेक्टेड होती. फक्त गुप्तता राखण्यासाठी आऊट गोइंग मेसेजेस बंद होते. तसेच ट्रॅकिंग करणारे सर्व सिग्नल्स प्रोहिबिट करण्यात आले होते.

केवल आणि निलो आपापल्या असाईन्ड सीट्स वर बसले. समोरच्या भव्य पांढर्‍या पडद्यावर 'वेलकम टू लाईफ' अशी अक्षरे झळकली.

थोड्याच वेळात तिथे निदांचा प्रसन्न,देखणा चेहेरा दिसू लागला. त्यांनी आपले प्रास्ताविक सुरू केले.
"मित्रांनो, तुम्हा सर्वांना इथे उपस्थित असलेले पाहून मला फार आनंद होत आहे.
आपल्या आश्रय दायिनी पृथ्वीचे, क्षमाशील अशा वसुंधरेचे वर्धन आणि रक्षण करण्याचा वसा आपल्याला उचलायचा आहे. हे आव्हान आहे - आपल्या अस्तित्वालाच असलेले आव्हान!
हे कसे पेलायचे याची उत्तरं समाजाच्या, विचारवंतांच्या पोतडीतून नाहीत तर जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनशैली तून आपल्याला शोधावी लागतिल. हे काम आपल्या नेट्वर्क चे आहे. माणसं हवीत... अशी माणसं हवीत ज्यांना काहीतरी भव्यदिव्य करायची प्रेरणा आहे, काहीतरी चांगले करायचे आहे, काही चांगले बनायचे आहे...माझा पूर्ण विश्वास आहे, अशी माणसं आहेत, सर्वत्र आहेत.
बदल हे असेच होत असतात. तुम्हाला फरक जाणवणार नाही. हा काही कुणी कुणावर मिळवावयाचा विजय नाही. हा नैतीकतेचा पूर्व लिखीत विजय असणार आहे.
माणसां माणसांची साखळी तयार करा. विश्वासाची, सहकार्याची....
कार्बन सायकल रिव्हर्सल - कठीण असली तरी अशक्य नाही. प्रयत्नांचं हे बीज मनामनांतून झिरपत जाईल.
नकळत तिचा प्रसार होत राहील. बुद्धिमान लोकांची आदर्श जीवनशैली म्हणून ती नैसर्गिक रित्याच अंगीकारली जाईल. हेच माझे स्वप्न आहे.........तुम्हा सर्वांचे सल्ले, विचार यांचं स्वागत आहे."
निदांचं मोजक्या शब्दांतलं प्रभावी भाषण ऐकून सर्वजण च काही काळ विचारात हरवून गेले.

"मला थोडं बोलायची इच्छा आहे." एक धीरगंभीर, खर्जातील आवाज घुमला. अध्यात्मिक क्षेत्रातील एक अधिकारी पुरुष,सर्व धर्मांचा ज्यांचा सखोल अभ्यास आहे आणि सात्विकतेच्या व अध्यात्मा च्या बाबतीत ज्यांचा शब्द प्रमाण मानता येईल, असे श्री पद्मनाभ बोलत होते. व्यासंगाचे, विद्वत्तेचे तेज त्यांच्या चेहेर्‍यावर झळकत होते.
"मित्रहो, माझं क्षेत्र हे तुम्हा सर्वांपेक्षा निराळं असलं तरी मानव जातीचे आणि पर्यायाने आपल्या धरतीचे रक्षण करण्याची जबाबदारी माझीही आहे असे मी मानतो.
हिंदू धर्मात, फार पूर्वीपासून 'धर्म' या संकल्पनेचा फार साकल्याने विचार झाला आहे. त्याचे पुढे अनेक अन्वयार्थ निघाले आणि ती कल्पनाच मुळी वादग्रस्त ठरली हा भाग वेगळा.
पण शास्त्रे समतोल पणाने अभ्यासली तर आदर्श जगण्याची पद्धती आपल्या पूर्वजांनी नेटकेपणाने अंगीकारली होती हे दिसून येते. आपल्या गरजा कमीत कमी ठेवणे, निसर्गातल्या सर्व गोष्टींची म्हणजे झाडे, फुले, पाणी, वारा यांची देवता म्हणून पूजा करणे यावरुन काय दिसतं?
कर्माची अपेक्षा न करता म्हणजेच निरपेक्ष पणे काम करीत राहिलं तर आपोआपच आपण एक समतोल, विचारी व्यक्ती बनण्यास प्रवृत्त होऊ. वृत्ती मधला असमतोल, लोभीपणा, स्वार्थ हेच र्‍हासाला कारणिभूत ठरतात. तेव्हा स्वतःचे व्यक्तिमत्वच अधिक स्वच्छ, परीपूर्ण आणि व्यापक बनविणे हाच मला यावर अंतीम मार्ग दिसतो.
यासाठी सर्वांनी धर्माचे आचरण करावयास हवे. अधिक डोळस पणे, आजच्या काळाला लागू होतील अशा धर्माच्या संकल्पना बदलून हा मार्ग स्वीकारायला हवा असे माझे आग्रही प्रतिपादन आहे."
पद्मनाभ यांनी आपले वक्तव्य संपविले तरी त्याचे पडसाद दीर्घ काळपर्यंत सभागृहातील प्रत्येकाच्या मनामनांतून ध्वनीत होत होते.

Monday, August 27, 2007

अंतीम युद्ध - अध्याय २- भाग ४

"केवल, वुईल पिक यू अप इन सेवन मिनिट्स" निलो चा मेसेज आला तेव्हा केवल अगदी तयारच होता. त्याने एट्रियम च्या स्वयंचलित दरवाज्यात आपले कार्ड स्वाईप केले आणि तो निलो च्या गाडीची वाट पाहू लागला.
काही सेकंदातच तिची लालचुटुक कार झर्रकन आत आली आणि केवल आत शिरला. वडुरा स्टेशनच्या गेट्रियमचा पासवर्ड एंटर करताच गाडी आपोआप उपलब्ध असलेल्या पार्किंग स्लॉट वर गेली आणि केवल-निलोफर ने सकाळी ७:०७ ची फ़्लॅशफास्ट पकडली.
त्यांना दहा वाजेपर्यंत मुंबई कोस्ट ला कुठल्याही परिस्थितीत पोहोचायला हवे होते.
-संघटनेची मिटींग होती!

केवल ला त्याच्या पहिल्यावहिल्या संघटनेच्या बैठकी बद्दल फारच उत्सुकता होती. निलो तर नुसती उत्साहाने सळसळत होती. "केवल, आज पुन्हा निदां ना बघायला -ऐकायला मिळणार. मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू! ही इज सो डायनॅमिक एन चार्मिंग." ती जातांना त्याला म्हणालीदेखिल.

समुद्राच्या तळाची तयार केलेल्या विशेष विवरात- 'निती डोम' मध्ये ही खास सभा होती. विशाल पायर्‍या पायर्‍यांच्या स्टेडियम सारखी रचना असलेले हे सभागृह वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यात ध्वनिक्षेपकाची गरज लागत नसे. तसेच समुद्राच्या तळाची असलेला निळा प्रकाश पुनः परावर्तित करून त्याद्वारे उत्तम प्रकाश योजना साधली गेली होती.
या बैठकीत संघटनेची उद्दिष्टे, त्यांची अंमलबजावणी, त्यातील अडथळे यांवर चर्चा केली जाणार होती.
अर्थात 'मिशन अर्थ' च्या सर्वच बैठकी अत्यंत गोपनीय पण मोकळ्या वातावरणात होत. कुणालाही आपले म्हणणे मांडण्याची संधी असे आणि प्रत्येकाचे मत विचारात घेतले जाई.

फ़्लॅश फास्ट ने त्यंना बरोबर पावणे दहा ला मुंबई कोस्ट ला सोडले. तिथून बर्‍याच आडवळणांनी त्यांनी निती डोम ला उतरण्याचा किनारा गाठला.

Friday, August 24, 2007

अंतीम युद्ध - अध्याय २- भाग ३

५/एप्रिल/५००७

आकाश भर पसरलेल्या काळ्या कार्बन च्या धुरातून उगवत्या सूर्याची फ़िकट छाया दिसली तशी विरिता उठून बसली.
"सकाळ पासून डोकं अगदी धरलं आहे. अगदी यंत्रवत रुटीन चालू आहे आपलं ...." ती मनाशीच म्हणाली.
"आंद्रेशा, अगं आवर तुझं. आज तुला पूर्वीच्या आशिया खंडावर ट्युटोरिअल आहे नं? मग, कल्टीकॅप ला ड्रायव्हर्स फ़ीड करून ठेव, आयत्या वेळी मग सर्च करत बसतेस.
आणि तुझे को-ऑर्डिनेट्स पण फ़ीड कर, नाहीतर नेहमी प्रमाणे तुला लोकेट करत राहतील टिचर्स जिओटेल वर. " तिने आंद्रेशाला सूचनांचा भडिमार केला.

"आणि मला माझ्या या डोकेदुखीवर पण उपाय शोधायलाच हवा लवकर..तसही ब‍र्‍याच दिवसांत आवर्तिनीशी बोललेच नाहीये.." विरीताने विचाराच्या नादातच तिच्या इन्फ़्रोट्रिस वरुन तिच्या कराचीच्या डॉक्टर बालमैत्रिणीला ऑनलाईन घेतले.
"हाय...विरीता..किती दिवसांनी..व्हॉट अ प्लेजर..कशी आहेस?" आवर्तिनी चा आनंद ओसंडत होता.
"अगं, काही ठीक नाही. खूप डोकं दुखतं आहे. अनीझी वाटतं आहे. मळमळतं आहे..."विरीता ने तक्रार सांगीतली. "ओह! प्लीज तुझी हिल्चिप इन्सर्ट कर पाहू." आवर्तिनी डॉक्टरच्या भूमिकेत शिरत म्हणाली.
विरीता ने आपला डावा हात टर्मिनल वर ठेवला. तिकडे आवर्तिनी चा इन्फ़ोट्रिस डायग्नोस्टिक टेस्ट्स रन करु लागला.
थोड्या वेळाने ती म्हणाली "ठीक आहे विरीता, काळजी करण्यासारखे नाही. जरा टेंशन कमी घेत जा गं. मी मेडिसीन्स फ़ीड करायला सांगते तुझ्या फ़ूड इनपुट वर्कप्लेस वर. तुझा आयडी सांग जरा."
विरीता ने आपला क्रमांक सांगितला. लगेच त्यावर आवश्यक ती औषधे ऍड करण्याची रिक्वेस्ट ट्रान्सफर झाली.

"चला झाली एकदाची सकाळची कामं.." मिसेस लेकशॉ त्यांच्या रूम मधून येत म्हणाल्या "काय गं विरीता, बरं नाही वाटत का?" तिच्या म्लान चेहेर्‍याकडे पाहून त्यांनी धास्तावुन विचारले. "झोप बघू तू. मी पाहाते. माझं पूजा-जप सगळं आवरलंच आहे आता."

"छे हो, थोडी कसकस आहे. वाटेल बरं. औषधं घेतली आहेत." विरीता उत्तरली.

तंत्रज्ञान अतिशय प्रगत असलेल्या या काळात आपले आवडते जेवण स्वतः बनविण्याचा साधा आनंद मात्र मानवाने केव्हाच गमावला होता. उपलब्ध असणार्‍या अतिशय मर्यादित रिसॉर्सेस मध्ये घाउक अन्न बनविले जाई, त्याचा द्रव अर्क काढून ते प्रत्येकाची न्युट्रीशनल गरज लक्षात घेउन त्याला फीड इन केले जाई. या सर्वांचे व्यवस्थापन कम्युन चे कर्मचारी करीत.
विरीताने स्वतःचा ब्रेकफास्ट फ़ीड इन करुन घेतला व ती इतर कामांकडे वळली.

दृष्य बदल:
डॉ लेकशॉंनी आपली काळीभोर रोल्झाना कार सफ़ाईदार पणे पोर्च मध्ये वळवली आणि ते पायर्‍या चढून वर आले. "किती हा उशिर! रात्रभर लॅब मध्ये करमतं तरी कसं तुम्हाला! तुम्ही आणि तुमचं ते 'चीर निद्रा'ड्रग..इथे आम्हालाच चीरनिद्रा लागायची वेळ आली तरी तुम्ही येणार नाहीत.." मिसेस लेकशॉ टिपीकल बायकोप्रमाणे वैतागल्या होत्या.
"अगं आमचं संशोधन आता अगदी अंतीम टप्प्यात आहे. बरेच महत्त्वाचे निष्कर्ष अपेक्षित आहेत. अशा वेळी मला प्रायमरिली तिथे असायलाच हवं की नकॊ?" ते नेहमीच्याच निरुत्तर करणार्‍या शांत आवाजात बोलले.


व्याख्या : हिल्चिप - जन्मतःच मानवाच्या शरीरात इन्सर्ट केली जाणारी इंटेलिजंट चिप. त्याद्वारे रोगाचे निदान अधिक अचूक व रिमोट्ली होऊ शकते.

Wednesday, August 22, 2007

भाग २

सिक्युरिटी चे सगळे सोपस्कार पार पाडून ते एका मोठ्या अनेक लॉबीज असलेल्या इमारतीत शिरले.
निदा स्वतः एका कम्युन मध्येच रहात होते. एका उंच टेबलमागे ते बसले होते. समोर त्यांचा अद्ययावत इन्फ़्रोट्रिस होता. त्यावरच्या 'सरफेस स्क्रीन' वर अनेक बटने लखलखत होती. इंटेलिवर्क द्वारे लॉगिन करून त्यांनी निलो व केवलला ट्रस्ट इश्यु केल्यावरच समोरचा सुडो पडदा उघडला आणि आत असलेल्या खर्‍या निदांचे त्यांना दर्शन झाले. (तो पर्यंत त्यांची खरी वाटणारी इमेज च केवल ला दिसू शकत होती). त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून केवल आणि निलो दिपल्यासारखे झाले.
"सर, मी निलोफ़र! आपल्या संघटनेची सदस्या आहे. आणि आज या माझ्या मित्राला, केवलला पण सदस्य होण्याची इच्छा आहे. प्लीज...." भारून गेल्याने निलो ला पुढे काही बोलताच आले नाही.

"हे बघ, आपल्याला केवळ संख्यात्मक नाही तर गुणात्मक काम करायचे आहे. आपल्या उद्दिष्टांनी प्रेरित होऊन, भारून गेलेल्या तरुणांची तर आपल्याला गरज आहेच, पण ते पूर्ण डेडिकेटेड आणि विश्वासू हवेत. याला तू आपली संघटना, तिची उद्दिष्टं याविषयी पूर्ण कल्पना दिली आहेस का?"
निदांचा आवाज प्रेमळ तरीही खंबीर होता. "काय करतो हा?" त्यांनी विचारले.
"मी केवल लेकशॉ, नुकतच मी माझं बेसिक ग्रॅज्युअएशन पूर्ण केलं आहे, आणि आता संरक्षण विभागात रिसर्च विंग मध्ये रुजू झालो आहे" केवल ने सांगीतले.

"लेकशॉ...म्हणजे जेनेसेसिस्ट डॉ.विधिस्तव लेकशॉंचे...?" "हो हो, मी त्यांचा नातू."..केवल स्पष्टीकरण देत म्हणाला.
निदां चा चेहेरा एकदम गंभीर झाला. त्यांच्या अथांग निळ्या डोळ्यात विषादाची एक छटा चमकून गेली. "निलो, माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आधीच आपल्या संघटनेला अनुयायी कमी, त्यात तू असे घरभेदी लोक आणू लागलीस तर कसे व्हायचे? मानवजातीचे कल्याण हे एकच उद्दिष्ट - मग त्यासाठी पूर्ण विश्वाची उलथापालथ का होईना - असे मानणार्‍या आपल्या संरक्षण विभागातला उगवता शास्त्रज्ञ हा आपला सभासद होऊ शकेल असे तुला वाटलेच कसे?"
ते एकदम व्यथित होऊन उदगारले. "मला माहिती आहे सर, पण केवल ची मते वेगळी आहेत. त्याला शांतता पूर्ण मार्गाने, सगळ्यांना बरोबर घेवून, संशोधन करायचे आहे...नॅनो स्पिटीकल वर मानव वंश प्रस्थापित करायला तर त्याचा पूर्ण विरोधच आहे. त्या ऐवजी इथेच राहून ही धरित्रीच पुन्हा सुजलाम सुफ़लाम कशी करता येइल, यात त्याला जास्त रस आहे.
म्हणूनच त्याला आपले सदस्यत्व हवे आहे." निलो ने आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला.

"हो, केवल? हे खरे आहे?" निदांनी केवल ला विचारले. त्यांचा स्वर साशंक होता.
"खरं सांगायचं तर, सर,मी द्विधा मनःस्थितीत आहे. माझे कुटुंबिय, स्वजन यांचा विचार केला तर 'लवकरच अस्तंगत होत असलेली प्रजाती'हा मानवजाती वरचा शिक्का कसंही करून दूर करावा असं वाटतं, पण संपूर्ण विश्वाचा, त्यातल्या वर्षानुवर्षे अव्याहत पणे चाललेल्या क्रिया प्रक्रियांचा विचार करता, हे बदलायचा आपल्याला काहीच अधिकार नाही असेही वाटते.
यातून काहीतरी सुवर्णमध्य शोधायला हवा. मानवाच्या बुद्धिमत्तेवर माझा पूर्ण विश्वास आहे फक्त त्याच्या 'ओरबाडून घेण्यार्‍या आक्रमकते' वर इलाज शोधायला हवेत. आजवरचा इतिहास पहाता, आपल्याला आपल्या चुका सापडणं काही अवघड नाही.
मला वाटतं त्यातूनच आपण काहीतरी मार्ग काढू शकू. संघटनेचा सदस्य होण्यामागे माझा असा जरा वेगळा आणि व्यापक दृष्टिकोन आहे, सर. विरोधासाठी विरोध नाही, तर काहीतरी रचनात्मक आणि उपाय सूचक विरोध महत्त्वाचा आहे."
केवल च्या स्वरात आत्मविश्वास आणि मार्दवाचं अनोखं मिश्रण होतं.

"वेल, यंग मॅन..आय ऍप्रिशिएट युअर व्ह्यू, पण तुझ्या निष्ठा मात्र दुहेरी ठेऊ नकोस. तुला काहीतरी एक स्वीकारावं लागेल." निदा म्हणाले. "फ़ॉर टाईम बिइंग, मी तुला मर्यादित सदस्यत्व देण्याची शिफ़ारस करेन.तुला आमच्या सिस्टीम्स वर लिमिटेड ऍक्सेस राहील. या काळात तुझ्या निष्ठा आणि सचोटि तपासली जाईल. मगच तू आमचा कायम सभासद होऊ शकशील. मेमरी स्टिक वर डेटा आणला असेल, तर चंद्रमेरी कडे दे, ती पुढच्या फ़ॉरमॅलिटिज पूर्ण करेल. सी यू अगेन, या अतिशय अनादि अशा तत्वांच्या लढाईत तुमचे स्वगत असो." निदांनी निरोपादाखल त्यांना एक एक छोटा ऑक्सिजन - ओझोन चा मास्क दिला.


"आय ऍम सो एक्साईटेड...केवल...तू आता आमचा एक सद्स्य आहेस." निलो बाहेर पडतांना त्याच्या गळ्यात पडत म्हणाली. केवल उत्तरादाखल नुसताच हसला. त्याच्या मनात काय होते?


क्रमशः

Tuesday, August 21, 2007

अंतीम युद्ध

"कसं काय" ब्लॉग वर यापूर्वी प्रसिद्ध झालेली ही विज्ञान काल्पनिका ! ती अपूर्ण वाटली अशी ब‍र्‍याच वाचकांची प्रतिक्रिया आल्याने, एक अभिनव प्रयोग म्हणून मी ती पुढे लिहीत आहे. अर्थात लेखिकेच्या परवानगीनेच!
कसं काय च्या लेखिकेला अर्थात प्रश्नांची उत्तरं वाचकांकडूनच अभिप्रेत होती.

मला माझ्या मर्यादांची पूर्ण जाणिव आहे, व हा एक प्रयत्न आहे.



अंतीम युद्ध - फेज २


"आ स्स्स्स्.!" आंद्रेशा ने आळोखेपिळोखे देत आळस दिला. "हा दादा म्हणजे मुलखाचा झोपाळू. कधी लवकर उठणार नाही.." त्याचे पांघरुण सारखे करीत ती बाथरूम कडे वळली.
चादरी च्या आतून केवल ने डोळे किलकिले करुन तिच्याकडे पाहिले, आणि काहीतरी आठवून तो ताडकन् उठलाच. "बापरे! मला नऊ वाजता सेंटर् ला पोहोचायचं होतं. मी कल्टीकॅप ला फीड् केलं होतं. त्याने रिमाइंड् का नाही केलं..?"
तो मनाशीच पुटपुटत तयार् होत होता. "कल्टीकॅप माझा केअर टेकर् आहे दादा, मी तुला ऍक्सेस प्रोहिबिट् केला आहे"
आंद्रेशा आतून ओरडली.
तिच्याकडे रागारागाने पहात केवल ने निलोला कॉनफ़रंस वर घेतले. त्याच्या सेल च्या छोट्या स्क्रीन वर तिची छबी झळकली. "निलो, आज निदांना भेटायचे आहे, लक्षात् आहे ना?" "बट् ऑफ कोर्स.." ती हसत् हसत् म्हणत होती.

केवल ने मग भराभर आवरले आणि कार ला डेस्टिनेशन फ़ीड करून तो निघालाच.
हायवे नं ४/अ-३ वर निलो त्याची वाटच पहात होती. "हाय केवल..!" तिने त्याची गाडी दिसताच स्वतःच्या सेलवरून इंटरप्ट दिला. पासवर्ड एंटर केल्यावर कार बरोब्बर तिच्या पुढ्यात थांबली. दरवाजे आपोआप उघडले. "केवल...तुला कधी वेळेत पोहोचता येईल का?" पुस्तक वाचत असलेल्या केवलला हलवत तिने विचारले "ओह, निलो, तू आलिस सुध्दा? मला कळलेच नाही. जुन्या भारत देशाचं इतकं
छान वर्णन आहे. लोक काय सुखि होते पूर्वी! नळाला धो धो पाणी यायचं, लोक डॉर्म मध्ये नाही तर स्वतंत्र पणे रहायचे, फळं फुलं मुबलक असायची, प्रत्येक तरुणाकडे बाईक असायची, रस्ते फ़्री असायचे... नाहीतर आता..कुठे निघायचं असेल तर तास भर आधी रोड ऍक्सेस बुक करावा लागतो..!" तो अर्धवट स्वतःशी व अर्धवट तिच्याशी बोलत होता.
"कमॉन, केवल.. वी मस्ट रश.."ती फारसे लक्ष न देता म्हणाली.

निदां कडे ते पोहोचले तेव्हा नऊ वजून गेले होते.

Thursday, June 28, 2007

अद्न्यानातलं सुख

आत्ता 'मराठी चित्रपटातील गाणी' वर ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी' वाचलं!
मलाच नवल वाटलं...गेली कित्येक वर्षं मी हे गाणं ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुच्छता मोठी....असंच म्हणत होते....मला असं वाटायचं देखिल की भेटीत 'तुच्छता' कशी काय असू शकेल बुवा..? पण म्हटलं की असेल काही...
तर आज तो फंडा क्लिअर झाला....


आपण किती गाढ अनभिद्न्यता बाळगत असतो!

Thursday, June 07, 2007

अभिरुची

स्वयंशिस्त, नीट्नेटकेपणा आणि एकूणच 'अभिजातता' ही अनुवंशिक असते असे मला वाटू लागले आहे.
म्हणजे काही लोकांची सामान्यतः बोलण्याची स्टाईल, एकूण व्यक्तिमत्व, आवडी, प्रतिक्रिया...सारंच कसं अगदी तोलून, पारखून, 'रिच' असतं........लूज टॉक्स नाहीत, फ़ालतू हसणे नाही, बोजड अपेक्षाही नाहीत.

आणि मला हेही पटलं आहे की आपण कितीही आव आणला तरी मूळ आडातच नाही तर पोहोर्‍यात येणार कुठून?
पण जेव्हा जमेल तेव्हा, अशा उच्च अभिरुचीच्या माणसांच्या सहवासात वेळ घालवून आपले आयुष्य थोडे समृद्ध तर करता येईल!

खरंच! आयुष्य जगण्याच्याही किती तर्‍हा असू शकतात नाही?
असं चाखत चाखत, रुचीने, सवडीने जगता यायला हवं. नव्हे, ते तसं जाणिवपूर्वक जगायला हवं...पण रोजच्या लढाईत आपण ती कोवळीक कधी हरवून बसतो तेही समजत नाही.

आणि दर वेळी सुखा आनंदाच्या, खर्च- खरेदीच्या क्षणी डोकं वर काढणारी ती खास मध्यमवर्गीय अपराधीपणाची जाणिव!
मूल्यं आणि तत्वं यांच्या कोषात लपेटलेली.....


पारंपारिकतेच्या अश्या विळख्यांमधून सुटणं किती अवघड आहे.

Wednesday, June 06, 2007

बंद झाली कवाडं...मन खुलता खुलेना

मला सद्ध्या राईटर्स ब्लॉक का काहिसं म्हणतात नं.....तो आलाय असं वाटू लागलं आहे.
त्यामुळे प्रतिभेचा प्रवाह काही केल्या खुलाच होत नाहिये.
ट्युलिप ने हे अगदी छान पणे मांडलं आहे.......कशावर लिहावं ....
......
जगजित चित्रा च्या हळुवार गझला, गुलाम अलिंचा आर्त पिळवटून टाकणारा सूर आणि बरंच काय काय आवडायचं.........
आता पडणारा पाऊस, गवतावरचे दवबिंदू किंवा पानगळीनंतरच्या पाचोळ्याचा चुर चूर आवाज...काही म्हणता काहीच मनाला भावत कसं नाही?

आयुष्य असं विरामचिन्हं विरहीत, प्लेन टेक्स्ट कसं काय झालं?

ग्रेस च्या कवितांचे अर्थ, जी एंच्या निर्व्याज गाभ्याच्या खोलवर भिडणार्‍या आर्त कथा, कायम आवडणारा चित्रपट 'सिलसिला', गौरी ची मुक्त अनिर्बंध स्त्री, सारं जग पिऊ पिऊ म्हणणारी कांक्शा........मनाचे हे सवंगडी आता पिंगा घालत नाहीत भोवती.......दुसरीच कसली तरी अपरिचीत जाणिव व्यापत जाते मन आताशा....
समर्पित केल्याची, (की आवाज हरविल्याची?)

Tuesday, May 15, 2007

पाककृती - कढीगोळे

आज मी तुम्हाला एका छान पदार्थाची कृती सांगणार आहे. -कढीगोळे.

हरभरा डाळ ५-६ तास भिजत घालावी. नंतर निथळून, वाटून घ्यावी. त्यात आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, जिरेपूड, कोथिंबीर, मीठ, थोडे लाल तिखट इ घालून मिसळून घ्यावे.
जरा आंबट ताकाची कढीपत्ता, मेथ्या इ. घालून कढी करावी. तिला उकळी आली की मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यात सोडावेत आणि मंद आचेवर चांगले शिजू द्यावे. गोळे सोडल्यावर लगेच ढवळू नये.
वाढतांना लाल मिरच्या तळून फ़ोडणी करावी व गरम भाकरी अगर भाताबरोबर खावे.

सूचना - कढीत बेसन जरा कमी घालावे नाहीतर नंतर फ़ार दाट होते.

प्रकार : हरभरा डाळी ऐवजी ओले हरभरे, ओले तूरीचे दाणे, मूगाची डाळ ही वापरता येईल.

Thursday, March 22, 2007

वॉटर

बहुचर्चित वॉटर सिनेमा बघितला. त्यातल्या तरलते विषयी, सहज फ़ुलत जाणार्‍या, शब्दांमध्ये फ़ार अडकून न पडता प्रवाही असणार्‍या पटकथे विषयी मला काही म्हणायचे नाही...पण मूळातला विषयच जरा एकांगी पणे मांडलेला वाटतो. त्यामुळे भारतात आजही विधवांना दिल्या जाणार्‍या वागणूकी विषयी गैर समज होण्याची जास्त शक्यता आहे. (किंवा तो तसा व्हावा असाच प्रयत्न आहे.)
एखाद्या संस्कृतीच्या, तत्वाच्या, प्रणालीच्या महानते बरोबरच काही त्रुटि, कमतरता या असतातच...त्यांना किती उदात्त करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
नाहीतर अनेक प्रसंगां मध्ये हिंदू धर्माने स्त्रियांना दिलेला मान सन्मान असा डावलला गेला नसता.
आणि विधवा तरी काय सगळ्या च अशा कमनशिबी थोडीच होत्या!
महाराष्ट्रात तर किती उज्ज्वल परंपरा आहे. माधव राव पेशव्यांच्या आई गोपिका बाईंपासून अनेक कर्तबगार स्त्रिया येथे होऊन गेल्या.

मान्य आहे की मूठभर का होइना, पण स्त्रियांना असा वनवास नशिबी आला...जिथून कुठलंच बाहेरचं दार उघडत नाही असा बंदिवास आयुष्य भर... तेही न केलेल्या चुकी साठी भोगावा लागला....
पण काळोखाला असलेली उजेडाची किनार दुर्लक्षून कसं चालेल?

अर्थात चित्रपटाला असणारी सगळी परिमाणं लावली तरी हा एक सुरेख चित्रपट आहे.
शेवटचा गांधींचा स्पीच जरा irrelevant वाटतो. त्यातून काहीच अभिप्रेत होत नाही.

सरला ने छुईया फ़ार गोड रंगविली आहे. तिच्या साठी हा सिनेमा बघायलाच हवा. आणि आपण असे नाही आहोत हे जगाला ओरडून सांगण्या साठी ही बघायलाच हवा

Wednesday, March 07, 2007

महिला दिन

आज जागतिक महिला दिन.........

अनेक शुभेच्छा!..........सगळ्या स्त्रियांना, कामकरी, कष्टकरी मोलकरणीपासून ते आय सी आय सी आय बॅंकेच्या डायरेक्टर पर्यंत, आय आय टी त ल्या गायत्री पासून संगीता च्या येसाबाई पर्यंत, सर्व मानिनिंचा मी गौरव करू इच्छिते!
स्त्री च्या सर्जनशीलतेला, सहनशक्तीला, तरलतेला, ...........उत्कट,आसूसून केलेल्या प्रितीला, पिल्लांसाठी प्रसंगी चवताळून उठणार्‍या तिच्यातील वाघिणीला आणि अशाच तिच्या असंख्य गुणांना अनेक शुभेच्छा!

हे जग अधिक सुंदर करण्याचं महत्व मोलाचं काम........तिचंच तर आहे!
तिची इर्ष्या, तिची भरारी, तिची दृष्टी...आणि तिचे आसू, तिचा कमकुवत पणा, तिचे चुकीचे निर्णय.....
कधी वर कधी खाली झुलणारा भावनांचा हिंदोळा.......

स्त्रित्वाच्या अनेक विलोभनीय पैलूंना झळाळी मिळो.........तिच्याच अंगभूत तेजाने ती अधिकाधिक तळपो या मनापासून सदिच्छा!

Monday, March 05, 2007

धारा

मध्ये एक चांगलं पुस्तक वाचनात आलं.........इंदिरा रायसम गोस्वामी चं....आधालेखा दस्तावेज - त्याचं भाषांतर - "अर्धिमुर्धी कहाणी".......
वृंदावन मध्ये असतांना तिला आलेले विलक्षण अनुभव आणि विशेषतः श्रीकृष्णाबद्दल तिचं चिंतन वाचण्यासारखं आहे. तिचं म्हणणं अस आहे की आपण सर्वच जण श्रीकृष्णाच्या त्याच त्या राजस, लडिवाळ रुपावर प्रेम करीत राह्तो, गोकुळातला रास खेळणारा, लोणी चोरणारा श्याम.............पण त्याचं पूर्ण रुप आपण कितीसं अभ्यासतो? तिला कायम श्रीकृष्ण एक व्यक्ती म्हणून बघावासा वाटतो!
देवत्वा पेक्षाही श्रीकृष्णाला आपल्यातलाच एक समजण्याची ही संकल्पना जरा जास्त 'आपली' वाटते.
.......भारतीय भक्तीच्या सुद्धा किती तरी धारा आहेत.....चैतन्य महाप्रभूंच्या मधुरा भक्ती पासून दत्तात्रेयांच्या कर्मठ साधनेपर्यंत.......
कदाचित हाही एक भक्तीचाच मार्ग असेल.........

Sunday, March 04, 2007

पाककृती

मी आज तुम्हाला एक नवीन डिश सांगणार आहे..........

साबुदाणा - वाटली डाळ यांचा उपमा

एक वाटी साबुदाणा व एक वाटी हरभरा डाळ रात्री भिजत घालून ठेवावे. दुसर्‍या दिवशी सकाळी डाळ उपसून वाटून घ्यावी. कढईत तेलाची फ़ोडणी करुन त्यात मिरचीचे तुकडे, कढी पत्ता, हिंग वगैरे घालून, त्यावर डाळ घालावी व एक वाफ़ आल्यावर, साबुदाणा घालून पुन्हा चांगले परतावे व वाफ़ आणावी. चवीला मीठ, साखर, लिंबू पिळून व कोथिंबीर -खोबरे घालून गरम गरम सर्व्ह करावे.