Friday, October 05, 2007

अंतीम युद्ध - भाग ९

दहा महिन्यांच्या अविश्रांत परिश्रमांनंतर प्रोजेक्ट ची रुपरेषा तयार झाली. सद्ध्या उपलब्ध असलेले अद्ययावत तंत्रज्ञान व उर्जा कार्बन सायकल च्या उलट प्रक्रियेस पुरेसे आहेत यावर कुणाचेच दुमत नव्हते.
फक्त त्यामुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता, स्फोट, वावटळी मानव कितपत साहू शकतील हाच मुद्दा होता. त्यासाठी चीर निद्रेचा पर्याय सुचविण्यात आला होता.
खोल समुद्राच्या तळाशी मोठी विवरं बांधून त्यात चीर निद्रे साठी झोपून जायचे...बाहेरच्या घडामोडींशी अनभिज्ञ.....

दृष्य बदल:
केवल चा चेहेरा विमनस्क होता. "पण का, आजी-आज्जो आणि आई तू सुद्धा.... सहभागी होता येणार नाही म्हणजे काय? या उपक्रमाचे आपण च तर उद्गाते आहोत...आणि आता तुम्हीच अशी कच खाल तर कसं होणार?" तो मोजून नवव्यांदा विरिता ला म्हणाला.
"नाही रे, कच खाण्याचा प्रश्नच नाही...आणि आमचा तुझ्यावर, तुझ्या सद्सद विवेक बुद्धी वर पूर्ण विश्वास आहे. पण आम्ही मात्र इथेच रहायचा निर्णय घेतला आहे. भावी पिढ्यांना उगवती ची दारे खुली करुन देतांनाच, आम्हाला मात्र या संहाराचे साक्षीदार व्हायला आवडेल. हा तरी एक अनुभवच आहे नं , केवल..
पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज काही जणांनी तरी त्याग सोसायलाच हवा, आजपर्यंतच्या आपल्या बेलगाम वागण्याचे क्षालन म्हण हवे तर. या बलीदानामुळे तुम्हाला मिळाल्याच तर काही गुड विल्स मिळोत." विरीता त्याला समजावत म्हणाली.

केवल ला काही ते फार पटलेले दिसले नाही.

वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळे प्रयत्न चालू होते. पद्मनाभ यांनी एका विश्व प्रार्थनेचे आयोजन केले होते. शिखर व त्याच्या ग्रुप ने जन जागरणाची व्यापक मोहीम आखली होती. विशेषतः लहान मुले डोळ्यापुढे ठेवून त्यांचे जागृतीचे काम चालले होते.

आधुनिक संपर्क साधनांमुळे जग अगदीच जवळ आले होते. त्यांमुळे बर्‍याच गोष्टी सुलभ झाल्या होत्या. अर्थात मानवी स्वभावाच्या अनेक कंगोर्‍यांचा प्रश्न होताच. प्रत्येकाच्या वेगळ्या शंका आणि त्यांचे निरसन करण्यानेच शिखर-विरीता थकून गेले होते.

Thursday, October 04, 2007

अंतीम युद्ध - भाग ८

डॉ लेकशॉ मात्र केवल च्या प्रतिवादाने प्रभावित झालेले दिसत होते. "माझा फक्त शास्त्रिय सत्यांवर विश्वास आहे. शाबित करण्यात आलेली आणि विश्वसनीय अशी शुद्ध सत्यं!
आपल्या राष्ट्रीय संरक्षण समितीच्या सदस्यांनाही मी हेच उत्तर दिले असते. बाकी मी काही जाणत नाही. किंबहुना तो माझा प्रांत नाही असे मी मानतो. पण तरीही,थोडे माझ्या मताबाहेर जाऊन, मी संरक्षण समितीलाही यावर विचार करायला भाग पाडेन. मी आपले सर्व संशोधन आणि निष्कर्ष तुम्हाला वापरायला देऊ शकतो.. त्याबद्दल हवी ती सर्व मदत मी करायला तयार आहे.

निदांच्या चेहेर्‍यावर मंद स्मित उमटलं...

एक पाऊल पुढे पडलं होतं!



डॉ लेकशॉंच्या अथक युक्तीवादावर अखेर संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षण समितीने ही मान तुकवली. मिशन नॅनो स्पिटिकल रद्द करण्यात येऊन त्याऐवजी ऑपरेशन सेव्ह अवर प्लॅनेट ची योजना कार्यन्वित झाली.

पुढचे चारपाच महीने केवल ला अजिबात उसंत नव्हती. बरेच मुद्दे विचारात घ्यायचे होते,अनेक बैठका घ्यायच्या होत्या आणि अनेकांच्या गळी ही कार्बन सायकल रिव्हर्सल ची कल्पना उतरवायची होती.

"केवल...कुठे इतका गुंतून राहीलायस? मला दिवस दिवस साधा ट्रॅकही करत नाहीस तू हल्ली. आपले हे आयुष्यही मोलाचे नाही का? पृथ्वीचे भले करण्याच्या या नादात तू सगळं जीवनच पणाला लावतो आहेस." निलोफर हिरमुसली होती.
"अगं, जगलो वाचलोच या प्रकल्पानंतर, तर मग आहोतच की, मला तू न तुला मी. पण आता हे फार महत्त्वाचं आहे, निलो. पृथ्वीचं आणि पर्यायाने संपूर्ण मानवजातीचं भवितव्य पणाला लागणार आहे. मला माहीती नाही आपल्याला हे करण्याचा अधिकार आहे किंवा नाही.
वाईटाबरोबर चांगलेही नको जळून जायला. कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाकारायची यात फार वाद होऊ शकतात. साधारणपणे अडीचशे-तीनशे वर्षे आपल्याला प्रदीर्घ झोप घ्यावी लागेल ...आणि प्रयोग यशस्वी झालाच तर मग आपल्याला उगवतीचे रक्तीम सूर्यबिंब पहायची संधी मिळू शकेल त्यानंतर.." केवल स्वप्नाळू डोळ्यांनी म्हणाला.