Saturday, September 27, 2014

कंचनीचा महाल

मेहेकर येथे गावाबाहेर एक पडीक मोठा वाडा आहे. तो कंचनीचा महाल या नावाने ओळखला जातो. त्याबद्दल एक आख्यायीका आहे. कंचनी ही एक लावण्यवती आणि रूपाचा अहंकार असलेली गणिका. नदीकिनारी तिचा प्रासाद होता. घुंगरांचे श्रृंगाररसपूर्ण बोल तिथे कायम निनादत असत. अनेक सरदार- सेनापती तिच्या सौंदर्याचे दिवाणे होते. पलीकडे लोणार सरोवराच्या काठी असलेले देवीचे देऊळ . तिथे जळणारा नंदादीप ...हे सगळ्या गावाचे श्रद्धास्थान होते. एक सरदार पुत्र तिच्या प्रेमात पडला. तिने आपल्या बरोबर मंदिरात येऊन देवीचे दर्शन घ्यावे अशी त्याची आकांक्षा होती. पण कंचनी पडली आढ्यतेखोर, रुपसंपन्न कलावंतीण. तिला गाव उतरुन पलिकडे जाणे कमीपणाचे वाटले. ती वदती झाली... "मी नाही येणार तिथपर्यंत. माझ्या याच वाड्यात माडीवर माडी बांधून मी देवीचे दर्शन घेईन."... झाले........मजल्यावर मजले चढविण्यासाठी कारागिर राबू लागले आणि एके दिवशी...ती प्रदोष पूजा करायला व देवीचा दिवा पहायला वरती चढली...... कवी ना घ देशपांडे यांची नितांतसुंदर कविता..कंचनी चा महाल.....



अशीच होती रे निःशब्द मधुर ती रात्र राजसवाणी
असेच खोलात वाहत होते रे या पैनगंगेचे पाणी
सोसून गारठा चंचळ जळाच्या रुपेरी लाटांत न्हाले
आणखी अशी या पश्चिमे कडून चढून वरती आले
गारठ पदर कंपित अधर भरला कलश माथी
जमले होते रे आधीच वरती प्रदोष पूजेचे साथी
अंगाला लंपट झालेले माझे ते विरल वसन ओले
पहात होते रे वरून भाविक आतून कामूक डोळॆ
दूरच्या क्षितीजा वरती होता रे कोवळा ... क्रमश:

Monday, April 21, 2014

Heartfelt!

आज अगदी वैतागाचाच दिवस होता. सकाळी दूधवाल्याने एकदम साडेतीन लिटर दूध दिले....आज ऑफीस ला सुट्टी...त्याला सांगायचे राहीलेच. आता दही विरजून बांधा! नंतर पेस्ट संपली म्हणून कनकची आरडाओरड आणि झोप मोडली म्हणून रजत ची तार स्वरात तक्रार! अरे, काय मुलं आहेत का कोण ही! माझी मदतनीस , संध्या येणार होती दुपारी...तिच्या ’स्पेशल’ चकल्या आणि चिरोटे घेऊन तर बाईसाहेब आल्याच नाहीत....आजारी आहे म्हणे!....माझा भिशीचा प्लॅन होता गरम मटार कचोर्‍या, गरम शेव, दही-बटाटे व उसाचा रस...असा खास ’इंदोरचा’ मेनू ठेवणार होते..सराफ्यातल्या सारखा तर..... ! आता भेळ-आईस्क्रीम असा महाराष्ट्रीयन मेनूच ठेवावा लागणार बहुतेक. आणि बायका तरी काय...दागिने आणि पदार्थ आणि रिलेशन्स ...यावरच बोलतात. हिर्‍यांचे मंगळ सूत्र आणि कानातले ...मी नाही आणत म्हणे..नवराच माझा आणतो... काय काय.....त्यालाच आवड आहे! (?!) .... इतका हौशी नवरा आणि इतकी अरसिक बायको...?हॅलो...! काही लोकांचं संभाषण ऐकत होते...जर बायको काही दिवस कुठे गावाला गेली...” तर त्याचं काय...तो काय हाताने करुन खाईल काय...?” अरे!.....? हाताने करुन खाणे म्हणजे काय कमी पणा आहे? ती नाही खात ते रोज? मला असे बायकांना डॉमिनेट करणारे, कोत्या विचारांचे , कधीही कुणालाही चांगलं न म्हणणारे, सदैव स्वतःच्याच विचारात मग्न राहणारे लोक आवडत नाहीत अजिबात...... मानाचे भुकेले पण कर्तृत्वशून्य, कपबशी साधी उचलून सुद्धा न ठेवणारे, स्वयंपाक हा सर्वस्वी बायकांचाच प्रांत असे मानणारे पण टीका करण्यास पुढे असणारे, शिळं अजिबात न खाणारे, सदैव ही भाजी कशाची, काय , त्याने काय अपाय होतो, त्यात काय आहे....असा चुकीचा विचार करणारे, कुठलाही नवा पदार्थ चिवडत चिवडत संशयी वृत्तीने खाणारे, कर्मकांड करणारे, स्वप्ने पडल्यावर उठून तसे तसे कर्मकांड करणारे, भीत.......मला का अशा लोकांच्या सहवासात रहावे लागते......! देवा! कधी वाटते की मी निश्चित पणे याहून अधिक वर्थ होते ! कशा यांच्या समजुती! मुलांना काही काम सांगायला नको...मुलींनी केलेले चाले्ल. सतत सूचना, निगेटिव्हीटी, ....

Tuesday, April 01, 2014

नित्यक्रम - ३


सध्या मीना प्रभुंचं ’चिनी माती’ वाचते आहे. अफाटच सुंदर पुस्तक आहे. तसंही चीन बद्दल मला पहिलेपासूनच विलक्षण आकर्षण,ओढ आणि कुतूहल आहे. आणि मीनाताईंनी अगदी बारिक सारीक वर्णनांनी चीन आपल्या डोळ्यांपुढे साकारला आहे. चीन...भरताला जरबेत ठेवणारा आपल्यासारखाच आपला प्राचीन शेजारी...काही बाबतीत आपल्या सारखाच...लोकसंख्या, भूगोल आणि संस्कृतीच्या विपुल छायेत. पण बर्यााच बाबतीत आपल्या पेक्षा भिन्न....स्वयंशिस्त, देशप्रेम, काटेकोरपणा, स्वच्छता....किती दाखले द्यावेत! इतक्या मोठ्या भौगोलीक विस्ताराला आव्हान न मानता संधी मानून विकास करणारा, कठोर कम्युनिस्ट तत्वांची कास धरुन प्रगती करणारा एक फोकस्ड देश! मला एकदा जायचंच आहे चायना ला. कनक रजत ची नुसती धम्माल चालली आहे. मनसोक्त टीव्ही, नेट आणि गेम्स....आईसक्रीम्स (एकाला बटरस्कॉच व एकाला चॉकलेट.....आपापली वगळून दुसर्‍या कुठल्याही फ्लेवर ला हात लावणार नाहीत...अगदी व्रतस्थ असल्यासारखी ! द्वाड कार्टी! एकाला चायनीज प्रिय आणि एकाला पिझा, बर्गर. एकाला बटाट्याची रस्सा भाजी तर एकाला काचर्‍या. एकाला साबुदाणा खिचडी आणि एकाला थालिपीठ.....घर म्हणजे काय हॉटेल आहे का? ऑर्डर द्यायला? आणि मी कोण? वेटर? मला वाटतं मी कोण हा आदी प्रश्न अगदी सहजतेने सुटला आहे माझ्या बाबतीत!

Tuesday, March 25, 2014

रोजनिशी २


हं..माझा ‘नियमितपणा’ म्हणजे जर महिनाभरात एकदा असेल तर कठीण आहे...पण नसल्या पेक्षा हे बरे नाही का?  कनक - रजत च्या एक्झाम्स आटोपल्या नं आज! हुश्श...! पेपर्स तर यांचे ’भारीच’ जातात....डोकं आपलं ’हलकं’ होतं ना पण! आदिही आला परवा परत...येतांना काय काय आणलंन...मी कितीदा सांगते की नको रे ते टॉब्लेरॊन, गॅजेट्स, बेल्जियम चोकोलेट्स, पर्फ्युम्स , शांपूज, झुळझुळीत टी शर्ट्स असलं आणूस...मुलं जाम मिस्युज करतात..पण ऐकत नाहीच! आणि आल्यावर फर्माईश काय तर थालिपीठ, दही, मिरचीचं लोणचं आणि साईडला तळलेला पापड.....मुलांना नकोच हे...त्यांना बर्गर आणि पिझा! आईंना खिचडी-तूप आणि मला...सर्व! मला असं हे टिपीकल गृहिणी स्वगत इथे लिहायचंच नाही खरे तर ! माझ्यातल्या सर्जनशील, प्रातिभ ..(वगैरे वगैरे...)...स्व ला उमलवायचं आहे ना! तसे मला रंग खूप आवडतात..सगळे...प्रसन्न हिरवा, (मोरपंखी रंगाचं तर मला नाव सुद्धा खूप आवडतं) भडक लाल, सौम्य गुलाबी, झळाळता सोनेरी आणि सदाबहार जांभळा......पण होळी खेळायला मात्र आवडत नाही....रंग असे ओबडधोबड पणे माखल्यावर नाही चांगले दिसत माणसांच्या चेहेर्यारवर ..आणि विशेषतः बेभानपणे खिदळणार्याा, उन्मत्त, अनुचित तरुणाईवर... .त्याला चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरणारी हळुवार भावुकताच पाहीजे....किंवा निसर्गाच्या ’डिफॉल्ट’ चित्र चौकटीची उत्कटता..फुलापानांची, डोंगर-दर्यां्ची आणि पाण्याच्या लहरी लहरींची..!

Sunday, March 02, 2014

लेखना मागची प्रेरणा......

आपण का लिहीतो......


मेघनाने हा प्रश्न विचारल्या पासून जरा विचार केला.. तोवर तर असं काही सुचलंच नव्हतं.

खरेच, मी विचार करतेय कधीपासून! का लिहावसं वाटतं आपल्याला?

ही उर्मी तशी फार आधीपासूनचीच...कॉलेज च्या वार्षिकांकातले लेखन, त्याही आधी निबंध स्पर्धांमध्ये मिळवलेली बक्षिसं, आणि मैत्रिणींना भरभरून लिहीलेली पत्रं...
पावसाच्या धारांबरोबर लिहीलेल्या अनेक कविता..पण मग हातातून धागा सुटत जावा तशी हीही सुटत गेली कधीतरी...परवा परवा ब्लॉग सापडेपर्यंत...

काय असते ती उर्मी? मनातल्या भावना, विचार अधिकाधिक समर्पकतेने व्यक्त करता यावेत ही असोशी? की भाषेच्या लालीत्यपूर्ण अलंकारांचा साज चढविण्याचा निव्वळ अट्टाहास?
की आपल्याला जे वाटते ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचा खटाटोप?

काही असो...लेखन आनंद देते मात्र. निखळ. काही सुचत नसते तेव्हा थोडी हूरहूरही! कुणाचे उद्देश निरनिराळे असू शकतात, पण मला तर ते फक्त माझ्या स्वतः च्या आनंदासाठी मीच लावलले एक झाड आहे असे वाटते. आणि लेखन म्हणजे तरी काय...वाचनाचे पडलेले प्रतिबिंबच ना? खूपदा तर मला सुंदर काही वाचायला मिळालं की त्याची दाद देण्यासाठी लिहावसं वाटतं! लोक इतकं देखणं, लोभावणारं कसं काय लिहू शकतात?
इतकी समृद्ध आपली मराठी, तिचे इतके झळाळते पैलू आणि तिला लाभलेले अनेक गुणवंत लेखक व कवी..किती आनंद आहे आयुष्यात!


अंतःप्रेरणा म्हणतात नं तशी. मनातून लडी उलगडत जातात..एकावर एक..शब्दांचे साज लेवून कविता पुढ्यात ठाकते, निर्मीतीचा आनंद याहून काय वेगळा असतो?

Saturday, March 01, 2014

Memories...

२७-फेब्रु-१४ आजपासून नियमित पणे रोजनिशी लिहायचा विचार आहे. अर्थात विचार असला तरी तो अंमलात येईलच असे नाही...तरी पण बघूया. घरी कनक-रजत ची नेमचीच दाणादाण! जुळे असले तरी एक गुण काही सारखा नाही दोघांच्यात. एक मस्तीखोर, दांडगट आणि दुसरा शांत, गंभीर. एक सारखा आपला क्रिकेट नाहीतर गेम्स च्या विश्वात आणि एक म्युझिक, वाचन आणि आवराआवरी करणार! आणि आदित्य तर काय......मुलांहून मूल होणार त्यांच्यात. मीच आपली ओरडणारी आणि चिडणारी....! परवा विश्वास आला तर दोघेही त्यालाच चिकटून..मामा मामा करीत..... आतात दहावीतली ही पोरं...परीक्षा वगैरेचा अजिबातच काही विचार का नाही करावासा वाटत ह्यांना कोण जाणे! आदित्यचा यू एस टूर पण आताच यायचा होता....फायनल डील आहे म्हणे! गौरी च्या एका पुस्तकामधून (बहुतेक चंद्रिके गं सारीके गं) ह्यांची नावं ठेवली कनक आणि रजत! आई म्हणाल्या देखिल...हिंदी साईडर वाटतात म्हणून! तर...बंगाली शिकायचं मी फारच मनावर घेतलंय! शरद बाबूंची पुस्तके मोह घालतात...त्या आत्मसमर्पित नायिकांबद्दल असोशी वाटते....त्यांची प्यारी, चंद्रमुखी, राजलक्ष्मी...सगळ्याच उत्कट, सक्त, कणखर! आदि म्हणतो की तुझं एकेक वेगळंच चालतं. पण आपण तसे तर सगळेच असतो , नाही का...? प्रत्येकालाच वाटतं की दुसयाचं काहीतरी वेगळंच चालतं! कनक-रजत एकदाचे चांगले शिकून मार्गी लागू देत बाबा...म्हणजे मी तरी सुटले. विश्वास म्हणतो की त्यांना दादाकडे जपान ला पाठव. म्हणजे मंजूवहिनी च्या डोक्यावर ही दोघं...आणिक कशाला! तशीही ती संजिताने परस्पर जाऊन लग्न केल्याने आधीच डिस्टर्ब्ड आहे! दादाचं पण एक विचित्रच हं. आता आईला वाटणारच की तर म्हणे की त्यात काय....तिचा मार्ग तिने शोधला हे चांगलं की वाईट..? मंजूवहिनी आधीच जरा भावनाशील, आणि संजू म्हणजे तर तिचा अगदी ठेवा होता...मी पाहिलंय नं लहान पणा पासून. आय मीन संजिताच्या लहान पणा पासून! “कन SSS क..!! खालून अर्पितची नेहमीची आरोळी! आणि उत्तर देणार रजत! ..“आलो रे!”.....’आता कशाला जाताय रे बाहेर....?..जरा उघडा की पुस्तकं..!’ माझा केविलवाणा प्रयत्न! या सावित्री बाई पण अगदी वेळेवर गैरहजर राहणार... “वैनी, आता मामाच्या मयतीला नाय गेल तर लोक त्वांड तरी बघतील का ?” करा आता पोळ्या, यांचं ’पनीर चिली’, माझं सूप-सॅलड आणि आईंचं भरीत, वरण भात.....सगळा स्वयंपाक उरका, भाज्या आणा, क्लासेस मॅनेज करा, सिलिंडर वाल्याला सुट्टे द्या, कपडे धुवा, ब्रेकफास्ट ला रोज काय करावे यावर डोके खर्च करा, धोब्याकडे कपडे द्या-आणा, गाड्यांमध्ये पेट्रोल भरुन आणा....एक ना दोन! या सगळ्या गडबडीत मुलं गेलीच बाहेर. हं! जाऊदे..मी तरी काय मरमर करु यांच्या मागे! संध्याकाळी डोसे करायचे आहेत. आदित्यचा फोन नाही कालपासून. इथे असतांना कितीही हिडीस फिडीस केली तरी तो दूर गेला की उगीचच अपराधी वाटतं.....इतर नवर्यांाच्या मानाने बराच बराय तो! जुळ्यांच्या बाळंत पणात मी अगदी खचलेच होते....तेव्हा खरा मायेचा आधार होता तो आईंचा, आणि आदिचा पण! काय खस्ता काढल्याय त्याने....कनक जरा जास्तीच चिडचिडा, रडका होता. रजत खेळकर. तर कनक ला रात्र रात्र हातांवर फिरवायचा, रजत ला सिपर ने दूध पाजायचा आणि अंघोळ तर दोघांनाही ..एकदम! रादर, त्यात त्याचीही अंघोळ होऊन जायची आपोआप. मुलांना बाबा म्हणजे एकदम प्रिय! आई आहेच आपली...ओरडायला, ब्रेकफास्ट बनवायला, शाळेत पॅरेंटस मीट ला यायला, को ऑर्डिनेट करायला, हातात चहाचा कप द्यायला... पण हे असंच आहे...मला अजिबातच खोटं बोललेलं सहन नाही होत आणि यांना ते जनरल, कॅज्युअल वाटतं..म्हणजे असतात गोष्टी लहान सहानच..पण तरीही...का? मन एकदम मिटून जातं...वाटतं आपण काहीतरी चुकतो का?