Tuesday, November 11, 2008

राजस्थान

प्रशस्त, लांबवर पसरलेले पॅसेजेस, दुतर्फा लटकविलेली राजांची , राण्यांची चित्रं, वंशावळी, प्रसंग…मोठाली दालनं...आणि न संपणारा बहादुरीचा इतिहास....
पन्ना दाईने केलेला त्याग आणि वाचविलेला एकमेव वंशज..
उत्कट मीरा, तिची आजही जाणविणारी कृष्णप्रीत……..
राणा प्रताप…त्याचा प्रिय घोडा चेतक, पद्मिनीचे असामान्य सौंदर्य…त्यापायी घडलेल्या लढाया आणि सांडलले रक्त, केलेले स्वाभिमानी जोहार, ……….
उदयपूर हा अनमोल ठेवा वाटत राहतो.

मोठे मोठे किल्ले, वाडे, पॅलेस, हवेल्या….त्यातून उलगडत जाणारी जुन्य़ा ऐश्वर्य संपन्न इतिहासाची झलक, अगदी नियोजीत शहर वाटावे असे विस्तीर्ण प्राकार, महाल, खेळविलेले पाणी, जनानाखाना…राजवैभवी सभामंडप, अस्त्रं शस्त्रं, भोजनगृहे, एका रांगेतली गुलाबी घरं ………....
वीर योद्धे आणि त्यांच्या कथा...लखलखता शीश महाल, शाही जलमहाल……………………………………
जयपूरचे सौंदर्यवर्णन संपता संपत नाही

वाळवंटातील अवर्णनीय जादू, मन भारून टाकणार्‍या प्रेम कहाण्या, केसरीया बालमा……… ची अवीट सुरावट….अपरिचीत शब्द आणि ओळखीची धून, अनिवार्य पणे होणारी “लेकिन” आणि हृदयनाथ च्या संगीताची आठवण...सूर तर दूर दूर पर्यंत पसरलेल्या वाळूत रेंगाळलेले अजून….मनही तिथेच थांबून राहिलेलं…घेरदार घागर्‍याच्या रंगीत आरशांमध्ये ..

तंतुवाद्याची रुणझुणती साद, नक्षीदार पायर्‍या उतरणारी पावलं, त्या वैभवाने अचंबित झालेलं मन, सदैव पडद्याआड रहावं लागणार्‍या लावण्यवती राजस्थानी ललनांपेक्षा महाराष्ट्रीयन स्त्रिया कितीतरी पुढे असल्याचा दाटून आलेला अभिमान.
राजपुत वीर….त्यांची बहादुरी, शौर्य, प्रेम, भक्ती, समृद्धी… डोळे दिपविणारी कलाकुसर, चित्रकला, कोरीव काम, कपडे…. इर्षा, दुष्मनी, व्यापार…………………….

हळदी रंगाच्या दगडावर कोरलेली अप्रतीम शिल्पं..............उधाणलेला वारा आणि बारीक उडणारी मुलायम वाळू..
तहान तहान झालेला कंठ आणि बोअर चं खारं पाणी....
पिवळ्या धुळीत वेढून राहीलेलं सुवर्ण शहर जैसलमेर विसरणं शक्य नाही.

राजस्थानच्या हाकेला "ओ" देऊन एकदा हे सारं अनुभवायला हवं.