Tuesday, August 25, 2015

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम



कविता महाजन यांचे ठकी आणि....हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. मराठीतील प्रवाह बदलेली आणि धाडसी कादंबरी - तीही एका लेखिकेने लिहीलेली असे नुसते तिचे वर्णन करुन तिला न्याय दिल्या सारखे आणि तिची दखल घेतल्या सारखे होणार नाही म्हणून ही सविस्तर समीक्षा.
खरे तर ह्या पुस्तकाचा दोन- तीन अंगांनी विचार करायला हवा. एक म्हणजे, तिचा फॉर्मॅट अथवा आकृती बंध. ही नक्की एक कादंबरी आहे, आत्मचरित्र आहे की निवेदनात्मक काल्पनिका आहे याच भोवर्‍यात वाचकाला खिळवून ठेवण्याचे काम पहिली शंभर-दिडशे पानं करते. दुसरे म्हणजे तिचा गाभा किंवा कथासूत्र आणि तिसरे म्हणजे लेखिकेची खिळवून ठेवणारी कथनाची हातोटी व पकड!
या कादंबरीची (सोयी साठी म्हणूया – कादंबरी!) नायिका- पद्मजा सप्रे- एक गाजलेली चरित्र अभिनेत्री . तिने प्रामुख्याने आईच्या भूमिका केलेल्या आहेत. पण तिचे व्यक्तिमत्त्व तिने केलेल्या भूमिकांच्या विरुद्ध आहे...म्हणजे सोज्वळ- सात्विक असे मुळीच नाही. ती एक धडाडीचे निर्णय घेणारी, मदिरा आणि (मदिराक्ष?) यांत बुडालेली स्वैरिणी आहे. तिच्या व्यक्तित्वाचे, तिच्या आजूबाजूला वावरणार्‍या माणसांचे आणि घटनांचे वर्णन आणि परिचय करुन देण्यातच पहिली दिडेकशे पाने संपतात. त्या भागाच्या शेवटी ती आत्मचरित्र लिहीण्याचा निर्णय घेते..व पुस्तकातच एक स्वतंत्र आत्मचरित्र – ’कळसूत्र’ नावाचे पुस्तक (मुखपृष्ठ- मलपृष्ठा सहित – एंबेडेड!) सुरु होते.    
त्यात पुन्हा तिचे लहानपण, आईचा अबोल, स्वार्थी स्वभाव व बाहेरख्याली वृत्ती व त्यामुळे हिच्यावर (न) घडलेले संस्कार याचे (पुनरुक्त) वर्णन येते. लहानपणची गरीबी, वडिलांच्या मृत्यूनांतर झालेले हाल, आईबद्दल तिला वाटणारा राग व द्वेष, तिचे मित्र - प्रियकर, तिच्या मोलकरणी, अभिनेत्रींमधील स्पर्धा- हेवेदावे, तिची असफल लग्ने, नाटक- सिनेमाचे अधांतरी विश्व, तिने बापाशिवाय मुलीला - अनाहिताला- जन्म देण्याचा घेतलेला निर्णय , दारु व पैसा, तिचे घारे –हिरवे डोळे व असामान्य रुप - त्यामुळे मिळालेले बरे वाईट अनुभव....यांचा धांडोळा घेत आत्मचरित्र संपते....
नंतर तिसरा भाग सुरु होतो- आत्मचरित्रा नंतर.-
हे थोडेसे एपिलॉग सारखे -  म्हणता येईल. त्यात तिच्या घसरत्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडलेला आहे. शिकून वकील झालेली अनाहिता- तिचे दिल्लीला जाणे- पद्मजाचे एकाकीपण, कुणी सरदेशमुख नावाच्या उद्योगपतीचा....आधी आत्मचरित्रात न आलेला उल्लेख-  - तिने त्यांचा उल्लेख पुस्तकात केला असेल की काय या भीतीने  – अगदी हार्ट ॲटॅक येईपर्यंत- व्यथित झालेला सरदेशमुख...
लेखिकेला तिचे प्रियकर कमी वाटले की काय नकळे, पण पुन्हा दोन तीन पात्रं आणली आहेत. डॉ. अरविंद - चांगला प्रथितयश, उच्चभ्रू डॉक्टर, घरदार- बायको असणारा..... हिच्या प्रेमात आकंठ - पण जपून जपून वागणारा......... तिला सत्तर लाखाची गुलाबाच्या आकाराची पर्स देणारा श्रीमंत  डॉकटर..आणि स्त्रियांना असं गोडी गुलाबीने, भावनिक आवाहन करुनच वश करावं लागतं अशी त्याची कारणीमिमांसा देणारा...डॉ. अरविंद   ...त्याची बायको ललीता...साधी , घरेलू, सेवाभावी!
तिला मदत करण्यास सदैव तत्पर असणारा दिग्विजय, अर्णव....आणि असे बरेच....
मग तिची झालेली विकलांग अवस्था, अल्झायमर ने स्मृतीभ्रंश झालेली पद्मजा, तिचे शून्य- संदर्भरहित विश्व, डॉ गायत्रीची लाभलेली साथ....ओसरलेले सौंदर्य व दुरावलेले चाहते.....

अशा वाटा वळणांनी कादंबरी अचानक एका अनपेक्षित , धक्कादायक वळणावर येऊन ठाकते.
वाचकाने कल्पनाही केली नसेल असे सत्य – सामोरं येतं. आपला कादंबरीचा वाचनाचा ॲगलच बदलून जातो. आधी बिनधास्त वाटणारी पद्मजा एकदम एकाकी , बिचारी होऊन जाते. पुन्हा पहिल्या पासून पुस्तक वाचून निसटलेले दुवे ह्या नवीन दृष्टिकोनातून तपासावेसे वाटतात. किंबहुना पुन्हा पुस्तक वाचून एका नव्या दृष्टीने तिच्या आयुष्यातील घटनांची आपण संगति लावतो...हे ह्या कादंबरीचे फार मोठे यश आहे असे मला वाटते.    
ते सांगून रसभंग करण्याचा मानस नाही.
या सगळ्या चढ उतारांत, नायिकेला कुठेही उदात्तता देण्याचा आणि ’करेक्ट’ ठरविण्याचा अट्टाहास दिसत नाही हे मात्र निश्चित उल्लेखनीय आहे. पण या प्रकारच्या कल्पनिका-कादंबरीला आवश्यक असणारी सलग, प्रवाही भाषाशैली, शारीर गोष्टींची धाडसी  मांडणी व सहज उल्लेख, एका नटीच्या जीवन चरित्रात अपरिहार्य असणारी अनैतिकता- तिचे केलेले संयत पण परिणाम साधेल व वातावरणनिर्मीती होईल असे वर्णन -  हे या पुस्तकाचे प्लस पॉईंट्स.
तसेच ह्या विषयाचा आवाका पेलणारी लेखिकेची पुस्तकावरील एक अदृश्य मजबूत पकड मात्र जागोजागी जाणवत राहते; जी विषयाला आणि कथावस्तूला इकडेतिकडे फटकू देत नाही. यामुळे कादंबरी मोठी असूनही तिच्यात एकजिनसी बांधीवपणा आलेला आहे.
एक वेगळा प्रयत्न आणि पारंपारीक कल्पनांना छेद देत एका लेखिकेने धीटपणे मांडलेला एका अभिनेत्रीच्या आयुष्याचा प्रवास व तिच्या समांतर जीवनकथेची न लागणारी संगती अनुभवण्या साठी  म्हणून हे पुस्तक वाचायला हवे.

Thursday, January 15, 2015

तुझ्यात जीव गुंतला

अमिता आणि निनाद....खूप जवळचे मित्र...कॉलेजात, ट्रेकिंग मध्ये..हसण्या-बोलण्यातले अगदी जीवश्च कंठश्च.....
कॉलेज नंतर निनाद औरंगाबादला गेला नोकरीला आणि अमिता पुण्याला ....पुढे शिकायला.
पण एकमेकांना नियमित पत्रं लिहीणे चालूच होते.  एकदा अशीच अमिता नागपूरहून पुण्याला येत असतांना मध्ये बस औरंगाबादला थांबली...निनाद ला ठाऊक होतेच की ती या बस मध्ये आहे. तो तिला भेटायला आला होता..तिला फार आनंद झाला त्याला पाहून...हाय हॅलो झाल्यावर तो म्हणे...की मला तुझ्याशी काही बोलायचे आहे...प्लीज रुमवर चल. तिने काही आढेवेढे घेतले पण निनादवरचा विश्वास इतका गाढ होता की ती त्याच्या आग्रहाला बळी पडून उतरली व रुमवर गेली. तिथे त्याने तिची काही पत्रे दाखवली ज्यावर अगदी भसाड्या अक्षरांत आय लव्ह यू असे लिहीलेले होते....प्रक्षिप्त.
ती चक्रावलीच. अमिताने असे काही लिहून पाठविल्याचा सपशेल इन्कार केला व ती परतली.
हे प्रकरण तिथेच संपले. नंतर निनाद ने तिला म्हटले की ते काहीही असले तरी मला तुझ्या कडून पॉझिटीव्ह उत्तर हवे आहे.....पण अमिता ला तसे कधीच वाटत नव्हते.....तिने नाही म्हटले....व तिच्या तर्फे त्या प्रकरणाचा पूर्ण विराम केला.
नंतर मात्र दोघांचेही मार्ग भिन्न झाले. अमिता एका उद्योग पतीशी विवाह करुन प्रतिष्ठीत घराण्याची सून बनली तर निनादनेही एका सुंदर मुलीशी लग्न करुन संसार थाटला...

२० -२१ वर्षांनी त्यांची गाठ अचानक एका मित्राकडे पडली. दोघेही थोडे अवघडले होते....
पण निनाद मात्र पुन्हा एकवार तिच्या प्रेमात पडला...त्याची जुनी आठवण पुन्हा जागी झाली...अमिताचे सदाबहार हसू, तिचा ऋजू समजूतदारपणा, वयाने जराही न बदललेलं तिचं तारुण्य आणि उलट स्थिरतेमुळे आणि अधिकाराने अधिकच खुललेलं तिचं रुप.......

निनाद ला अगदी वेडं व्हायला झालं होतं. तो तिला सारखे व्हॉटसॲप वर व फेसबुक वर मेसेजेस पठवू लागला.  . अमिता ने पहिल्यांदा त्याला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला की हे योग्य नाही. ती आता एका जबाबदार व्यक्तीची पत्नी आहे.....व तसेही तिने कधीही त्याच्यवर प्रेम केले नव्हते.  निनादही खरे तर हुशार होता, समजदार होता...पण तिच्या बाबतीत मात्र तो फार हळवा झाला होता....
अमिता ने त्याला परोपरीने समजाविण्याचा प्रयत्न केला....पण त्याचे एकच म्हणणे..की मलाही माहिती आहे की आपण आता एकत्र नाहीच येऊ शकत...पण मला फक्त तुझ्या बद्दलचे हे प्रेम व्यक्त करु दे. बाकी काही नाही...त्यामुळे मला खूप समाधान मिळते व आनंद मिळतो.
अमिता काळजीत पडली ...हे असे मेसेजेस तिच्या नवर्‍याने वाचले असते तर समस्या निर्माण झाली असती.....
अमिता मात्र त्याला कधीच प्रोत्साहन देत नव्हती....वेळोवेळी ती त्याला वस्तुस्थितीची जाणीव करुन देई...पण तो अधिकच गुंतत चालला होता.. प्रितीची ही रीतच न्यारी होती. कदाचित प्रेमाची ही ओढ त्याला स्वस्थ बसू देत नसेल. पण अमिताच्या हसर्‍या छबी, तिचे फ्रेश स्मितहास्य, तिची बांधेसूद कोवळीक त्याला वेड लावत होती हे खरे...म्हणजे आधी नसेल गुंतला इतका तो तिच्यात गुंतत चालला होता.

क्रमशः