Wednesday, December 03, 2008

दहशतवाद

मुंबईत झालेल्या बेछूट हल्ल्यामुळे मन सुन्न झाले आहे. काही विचार सुचत नाही! इतके आपण अगतीक का आहोत?

दहशत वादाचा मुकाबला करण्या साठी स्वतंत्र खाते (मिनीस्ट्री) स्थापन करायला हवे. त्यांचे काम फक्त एकच..देशांतर्गत सुरक्षितता ! गृह मंत्रालयाला या जबाबदारीतून मुक्त करावे. महत्वाच्या शहरांमध्ये त्यांची दले तैनात असतील.
नैसर्गिक आपत्ती, पूर, दंगे, सभा, इतर अपघात...यांत गृह खात्याला काम करू द्यावे...पण जेव्हाही दहशत वादाचा प्रश्न येईल तेव्हा हाय ऍलर्ट ठेवून बाकी कुणालाही मध्ये न घेता एकदम पद्धतशीर, प्रशिक्षण देऊन कारवाई करावी. सीमा सुरक्षा दल आणि मिलीट्री हे या खात्यासोबत संलग्न असतील. त्याचा मंत्री हा पारंपारीक निवडणूकीतून न ठरता एखादा वरीष्ठ पोलीस अधिकारी वा एक्सपर्ट व्यक्ती असेल.
त्यांना सर्वोच्च प्राधान्य आणि अधिकार असतील.
फोकस्ड ऍप्रोच आणि नियोजन यानेच दहशत वादाचा मुकाबला करणे शक्य आहे. सरकारे काही करु शकत नाहीत.

Tuesday, November 11, 2008

राजस्थान

प्रशस्त, लांबवर पसरलेले पॅसेजेस, दुतर्फा लटकविलेली राजांची , राण्यांची चित्रं, वंशावळी, प्रसंग…मोठाली दालनं...आणि न संपणारा बहादुरीचा इतिहास....
पन्ना दाईने केलेला त्याग आणि वाचविलेला एकमेव वंशज..
उत्कट मीरा, तिची आजही जाणविणारी कृष्णप्रीत……..
राणा प्रताप…त्याचा प्रिय घोडा चेतक, पद्मिनीचे असामान्य सौंदर्य…त्यापायी घडलेल्या लढाया आणि सांडलले रक्त, केलेले स्वाभिमानी जोहार, ……….
उदयपूर हा अनमोल ठेवा वाटत राहतो.

मोठे मोठे किल्ले, वाडे, पॅलेस, हवेल्या….त्यातून उलगडत जाणारी जुन्य़ा ऐश्वर्य संपन्न इतिहासाची झलक, अगदी नियोजीत शहर वाटावे असे विस्तीर्ण प्राकार, महाल, खेळविलेले पाणी, जनानाखाना…राजवैभवी सभामंडप, अस्त्रं शस्त्रं, भोजनगृहे, एका रांगेतली गुलाबी घरं ………....
वीर योद्धे आणि त्यांच्या कथा...लखलखता शीश महाल, शाही जलमहाल……………………………………
जयपूरचे सौंदर्यवर्णन संपता संपत नाही

वाळवंटातील अवर्णनीय जादू, मन भारून टाकणार्‍या प्रेम कहाण्या, केसरीया बालमा……… ची अवीट सुरावट….अपरिचीत शब्द आणि ओळखीची धून, अनिवार्य पणे होणारी “लेकिन” आणि हृदयनाथ च्या संगीताची आठवण...सूर तर दूर दूर पर्यंत पसरलेल्या वाळूत रेंगाळलेले अजून….मनही तिथेच थांबून राहिलेलं…घेरदार घागर्‍याच्या रंगीत आरशांमध्ये ..

तंतुवाद्याची रुणझुणती साद, नक्षीदार पायर्‍या उतरणारी पावलं, त्या वैभवाने अचंबित झालेलं मन, सदैव पडद्याआड रहावं लागणार्‍या लावण्यवती राजस्थानी ललनांपेक्षा महाराष्ट्रीयन स्त्रिया कितीतरी पुढे असल्याचा दाटून आलेला अभिमान.
राजपुत वीर….त्यांची बहादुरी, शौर्य, प्रेम, भक्ती, समृद्धी… डोळे दिपविणारी कलाकुसर, चित्रकला, कोरीव काम, कपडे…. इर्षा, दुष्मनी, व्यापार…………………….

हळदी रंगाच्या दगडावर कोरलेली अप्रतीम शिल्पं..............उधाणलेला वारा आणि बारीक उडणारी मुलायम वाळू..
तहान तहान झालेला कंठ आणि बोअर चं खारं पाणी....
पिवळ्या धुळीत वेढून राहीलेलं सुवर्ण शहर जैसलमेर विसरणं शक्य नाही.

राजस्थानच्या हाकेला "ओ" देऊन एकदा हे सारं अनुभवायला हवं.

Friday, October 24, 2008

दिवाळीच्या शुभेच्छा!

मित्रांनो

दीपावलीच्या तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा!
ही दिवाळी आणि नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, नवनवीन प्रतिभेच्या उन्मेषांचे, कृतिशील विचारांचे आणि प्रेरणेचे जावो!



अश्विनी.............

Wednesday, July 02, 2008

कंचनीचा महाल

तोच तो इच्छित दीपक दिसला काठाशी हासत आले
क्षितीजा पासून क्षितीजा पर्यंत आकाश कंपीत झाले
अहंते वर या ओवाळले रे मी पाचही हे प्राण माझे
भरून छातीत नेत्रांत धावले उन्मत्त उधाण माझे
ताठर नाचत होता रे माझ्या या भुवयां वरती माज
माथीचा चंद्रही बघत होता हा बुडून गेलेली सांज
तोच ती आली रे हाक त्या पोराची उभार ते हात होते
दाबून घट्ट हे अधर तरी मी समोर पहात होते
आतले कठीण्य तनूत आले रे तोच अन झाले मी काळी
कठीण पणा हा गोठून पडले दगड बनून खाली


माझ्या या महाला मधल्या प्रत्येक कमानी कमानी पुढे
वार्‍याच्या झुळूकी वरुन आत्ताच वाजत गेले रे चुडे
प्रत्येक रंगीत हातात होती रे उज्ज्वल दीपाची थाळी
प्रत्येक कपाळी शोभत होती रे मोत्यांची सुंदर जाळी
तुपाचे दीपक जाळून होता मी चांदवा धूसर केला
जेथून निघाले त्याच या भूमीचा संपूर्ण विसर केला
बाभळी वरल्या फुलांत आता मी सोसते पाऊस ऊन
आज मी आहे रे पाषाण होते मी कोमल कुसुमाहून
फुलले परंतु वाहिले नव्हते चंपक पुष्प मी ताजे
कळस लावून रितेच ठेविले मानस मंदिर माझे

खालच्या मैदानावर मी रात्रीत दुरात ऐकते टापा
ऐकते तमात एकाकी गुराच्या या भिंती जवळ धापा
कमानी कमानी मधून सारखा हुंकार देतात वारे
पाहत जातात भकास निळ्या या आकाशा मधले तारे
आतून लागते आच पण हा दगड पेटत नाही
सगळे पारखे दयेचे मायेचे कुणीच भेटत नाही
अंधार्‍या रात्रीत ती सारी नगरी तमात बुडते बाई!
मिटल्या दातांच्या ओसाड भिंती या बोलत नाहीत काही
पुनव येताच वासनामय मी दगडा मधून येते
महाला भोवती चांदण्या खालती तेच ते फेर मी घेते

कशी रे रंगवू आज मी राजसा ते चित्र पुसट लेले
पुनव रात्रीत माझे हे हिंडते मानस विस्कटलेले
दक्षिण दाराच्या बाहेर पडले अनेक शतके अशी
पाषाण मय हे अचल जिवीत सोशीत आहे मी पिशी
पडल्या शीळेला भेटला नाही रे कुणीच रंक वा राजा
मीच रे ऐकला मानव वांछेचा सुदीर्घ निःश्वास माझा
दोनच उरले मजले खालचे कुणीच नाही रे गडी
एकही कवाड नाही रे आणखी एकही नाही रे कडी
घुमतो पारवा झोंबतो गारवा वार्यात वाजते शिटी
सहस्त्र भुजंग बळाने राजसा एकच घाल रे मिठी !



समाप्त!


(ना घ देशपांडे या कविवर्यांविषयी अधिक माहिती मिळेल का?
इतके उत्कृष्ट लिखाण / काव्य करणारा कवि अंमळ दुर्लक्षित राहीला असे वाटते. कुणी यावर काही सांगू शकेल काय?)

इतकी दीर्घ कविता वाचाण्याचा पेशंन्स ठेवल्याबद्दल वाचकांचेही आभार

Friday, June 27, 2008

साहित्य संमेलन

"मराठी साहित्य संमेलन सन फ़्रान्सिस्कोमध्ये"

ही बातमी आनंददायी आहेच. मायमराठी साता समुद्रापार, देशांच्या सीमा ओलांडून नवे ध्वज रोवायला जाते आहे, याहून अभिमानाची गोष्ट काय असू शकते?

आणि आता तर ब्लॉग्जच्या, ई दळणवळणाच्या माध्यमातून जग एव्हढे जवळ आले आहे की इथे राहूनही आपल्याला संमेलनात सहभागी होता येईल. किंबहुना दर वेळेचे साचेबद्ध स्वरुप बदलून नवीन आयाम काय देता येतील याचा विचार व्हावयास हवा.

मराठी सोडून बाकी कुठल्या भाषेचे संमेलन इतक्या दूरदेशी साजरे झालेले आपण ऐकले आहे का? मग हा आपला सन्माननीय अपवाद नाही का?

माराठी सारस्वतावर प्रेम करणार्‍या आपणा सर्वांनाच मराठीला एक नवीन पैलू देण्याची ही एक सुवर्ण संधी मानावयास हवी. भाषेची समृद्धी ही तिच्या सुपुत्रांच्या कर्तबगारीवर देखिल ठरत असते.
म्हणून वेबिनार, ई कॉन्फरंसिंग, ब्लॉगर्स झोन, वेबकास्ट, नेट्वर्किंग अशा विविध माध्यमांतून हे संमेलन आगळेवेगळे ठरेल असे प्रयत्न करावयास हवे.

एखादे संमेलन परदेशी गेले तर बिघडले कोठे?
“उत्तर धृवावर संमेलन घ्या” म्हणणे केवळ हास्यास्पद आहे. दूर राहील्याने मराठी बद्दलचे प्रेम काकणभर अधिकच असेल असा विश्वास बाळगावयास हवा.

मराठी संमेलन फक्त महाराष्ट्रातच व्हायला हवे असा काही कायदा नाही!

कृपया आपली मते नोंदवा. मुख्यतः ते अधिक लोकाभिमुख आणि हाय टेक कसं हॊईल यावर आपली मते स्वागतार्ह आहेत!
(म्हणजे कुणी ते विचारात घेतील अथवा नाही हा वेगळा प्रश्न आहे!)....पण आपण विचार करायला काय हरकत आहे?

Tuesday, April 29, 2008

शाळा - मिलींद बोकील

नुकतंच मिलिंद बोकील यांचं 'शाळा' पुस्तक वाचलं...काय सुरेख वर्णन आहे! त्यांच्या भाषेत सांगायचं तर...सरस!

नववीतील काही मुलं,जी एका जणाच्या शाळेच्या वाटेवर असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या अर्धवट इमारतीत जमून येणार्‍या जाणार्‍यांची छेड काढत असतात, त्यांचे संवाद, भाषा, भिती....
शिरोडकर ला भेटायसाठी त्याने टाकलेली पावलं...तिचं बारकाईने केलेलं वर्णन...
घरची कडक शिस्त, आणि 'सु‍र्‍या' चे भानगडबाज, बेफ़िकीर विश्व यात चाललेली त्याची ओढाताण..त्यातून 'शिरोड्कर' विषयी वाटणारे प्रेम-आकर्षण....खूप तरलतेने, प्रवाहीपणे, मार्दवाने लिहीले आहे.


१२ ते १५ या पौगंडावस्थेतिल मुलांचे विश्व, त्यांचे भावनिक चढ उतार, त्यांची भाषा, समजूती...अतिशय सुरेख रितीने चित्रीत केले आहे.

"मी थोड्यावेळ तसाच सुममध्ये बसून राहीलो....सुममध्ये बसलं की मुलींना कुणी पाहतंय हे कळत नाही...".....अशी भारी वाक्यं...

खरंच शाळेत गेलेल्या प्रत्येकाने वाचायला हवे असे पुस्तक आहे. म्हणजे बरंच नॉस्टॅलजिक व्हायला होतं! खूप साधर्म्य स्थळे आढळतात.
विशेषतः कॅंप चे वर्णन तर अगदी सरस उतरले आहे. आणि भाषेचा फ़्लो तर किती उत्तम! कुठे म्हणून अडखळायला होत नाही.


आता मिलींद बोकील यांना 'शिरोडकर' च्या बाजूने पुस्तक लिहा अशी विनंती करायला हवी.

Friday, April 18, 2008

लेखना मागची प्रेरणा

आपण का लिहीतो......
मेघनाने हा प्रश्न विचारला तिच्या खो खो च्या खेळात, तेव्हा पासून विचार करतेय... का लिहावसं वाटतं आपल्याला?
ही ऊर्मी तशी फार आधीपासूनचीच...कॉलेज च्या वार्षिकांकातले लेखन, त्याही आधी निबंध स्पर्धांमध्ये मिळवलेली बक्षिसं, गझलांची विश्लेषणं आणि मैत्रिणींना भरभरून लिहीलेली पत्रं...पावसाच्या धारांबरोबर लिहीलेल्या अनेक कविता..पण मग हातातून धागा सुटत जावा तशी हीही सुटत गेली कधीतरी...परवा परवा ब्लॉग सापडेपर्यंत...

काय असते ती ऊर्मी? मनातल्या भावना, विचार अधिकाधिक समर्पकतेने व्यक्त करता यावेत ही असोशी? की भाषेच्या लालीत्यपूर्ण अलंकारांचा साज चढविण्याचा निव्वळ अट्टाहास? की आपल्याला जे वाटते ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचा खटाटोप?

काही असो...लेखन आनंद देते मात्र. निखळ. काही सुचत नसते तेव्हा थोडी हूरहूरही! कुणाचे उद्देश निरनिराळे असू शकतात, पण मला तर ते फक्त माझ्या स्वतः च्या आनंदासाठी मीच लावलले एक झाड आहे असे वाटते. आणि लेखन म्हणजे तरी काय...वाचनाचे पडलेले प्रतिबिंबच ना? खूपदा तर मला सुंदर काही वाचायला मिळालं की त्याची दाद देण्यासाठी लिहावसं वाटतं! लोक इतकं देखणं लोभावणारं कसं काय लिहू शकतात?

इतकी समृद्ध आपली मराठी, तिचे इतके झळाळते पैलू आणि तिला लाभलेले अनेक गुणवंत लेखक व कवी..किती आनंद आहे आयुष्यात!

मनातून लडी उलगडत जातात.. एकावर एक.., शब्दांचा साज लेवून कविता पुढ्यात ठाकते... निर्मीतीचा आनंद तरी याहून वेगळा काय असतो?

कुणासाठी म्हणून नसतेच ती अनिवार ऊर्मी ... ते फक्त जीवनाच्या एखाद्या भावलेल्या रंगाचे व्यक्त रुप असते...रंग कोणताही असो...दुःखाचा, आनंदाचा, उल्हासाचा...लिहून झाल्यावर मिळणार्‍या तृप्तीतच तिचे सार्थक असते.

Wednesday, April 09, 2008

जी ए - प्रतिभेचे दुसरे नाव

आत्ता जी एं चं "हिरवे रावे" पुन्हा एकदा वाचलं. किती अप्रतिम शब्दकळा, किती पॉवर आहे त्यांच्या लेखनात हे पुन्हा एकदा पटलं...स्वतःलाच!

छोटीशीच वाक्यं...पण सारा संदर्भ सामावलेला...अतिशय अर्थगर्भ, पूर्ण!

मला सगळ्यात आवडते ती कथा म्हणजे "बाधा"...मन सुन्न करणारा अनुभव...विषण्णता अशी दाटत जाते मनभर...

फक्त जाणीवेच्या अलवार पातळीवर असणारी प्रेमाची एक अबोध, हुरहुरती भावना मनाशी जपणारी त्यातली रमा, तिचे भाबडे विश्व, मनातून कधी ओठांवरही न आलेल्या तिच्या इच्छा, मनाची अनाकलनीय आंदोलनं आणि त्यातून तिचा डोहाच्या खोल पात्रात निसटत गेलेला प्रवास..
सगळेच विलक्षण सामर्थ्याने, सुंदरतेने पाकळी पाकळी विस्तारावी तसे फुलवत नेणारे जी एंचे लेखन...अहा!

साहित्यातले नोबेल मिळावे अशा त्यांच्या कथा आहेत... इतकी सजग, तरल अनुभूती असणारा आणि वाचकांनाही स्वतः बरोबर ती देणारा लेखक ..विरळा आणि म्हणूनच श्रेष्ठही.

त्यांच्या प्रतिभेला त्रिवार कुर्निसात!

Tuesday, January 29, 2008

चला दोस्त हो, आयुष्यावर बोलू काही.......

नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून? सुख,प्रेम,रेकग्निशन,श्रेय,मटेरिअल गोष्टी......?

पूर्वीचे ते निवांत, सुंदर रिकामे क्षण चांगले की आताचे धावपळीचे पण अनिश्चित आयुष्य चांगले....

"बैठे रहे तसव्वुर ए जाना किए हुए", म्हणत असं प्रेमावर विसंबत, रेंगाळत ,त्या अनुषंगाने येणार्‍या अपरिहार्य कमतरतेला स्वीकारत जगलेलं बेधुंद आयुष्य खरं की,
"गोल" च्या मागे लागून धावाधाव करीत, उसंत न घेता अविश्रांत श्रमून मोलानं मिळवलेले विसाव्याचे क्षण अधिक आनंददायी.....

आपणच आपलं ठरवायला हवं.....लॉंग टर्म उद्दिष्ट ..........

स्वच्छ सूर्यप्रकाशात, निखळ चांदण्यात, समुद्राच्या गाजेत, वार्‍याच्या पाव्यात.........जीवन असं वेचून घेता यायला हवं.

Tuesday, January 22, 2008

अंतीम युद्ध - अंतीम भाग

१४ एप्रिल ५१२७

सेव्ह अर्थ मिशन ची दुसरी आणि अंतीम फेज चालू झाली होती. प्रयोगाच्या सुरुवातीला पृथ्वीवर जागी आणि जिवंत असलेली सगळी माणसं आता मृत्यू पावली होती.
सगळ्या अवनीवर एक भीषण शांतता नांदत होती.
फक्त अधून मधून होणारा स्फोटांचा भयंकर कानठळ्या बसविणारा आवाज, उठणारा धुरळा, ऑटोमॅटीक रोबोट्स आणि मशीन्स च्या हालचाली, प्री प्रोग्रॅम्ड प्रोसेसेसची अंमलबजावणी...यांचेच काय ते साम्राज्य होते.

बरीच कार्बन डाय ऑक्साईड ची सिंक्स जमिनीलगत साठली होती. शक्तिशाली माईन बॉम्ब्ज द्वारे त्यांना खोल जमिनीखाली खेचून अधिकाधिक ऑक्सिजन रिलीज करण्याची योजना कार्यान्वित होत होती.
भूगर्भात CO2 ओढून घेऊन O2 चे प्रमाण वाढविण्यात येत होते.


प्राणवायू! चराचराला आपल्या अंकित करणारा एक प्रभावी, दीप्त , ओजस स्त्रोत! ..सार्‍या सृष्टीचा आदी,मध्य आणि अंत !.. जीवनाचा मूलाधार.


आज प्रथमच सूर्याची किरणं धुक्याचं कवच भेदून जमिनीपर्यंत पोहोचली होती. गेली अनेक दशकं धुरकट,खिन्न काळोखात असलेल्या पृथ्वीला त्या सोनसळी किरणांची फार फार अपूर्वाई होती.
नव्या प्रकाशमय युगाची जणू ती एक झलक होती.
.................


.................

हवा हलकेच स्वच्छ, नितळ होत होती. वातावरणात किंचीत उबदार ताजेपणा होता. हिमालयातल्य़ा कुशीत असलेल्या त्या निर्जन, कधीकाळी एका वाहत्या नदीचे खोरे असलेल्या प्रदेशात एक अंकुर उगवला होता. जीवनाची पहिली लसलसती निशाणी.नव्या आशेचा पहिला उन्मेष.
दोन हिरवीगार, नाजूक पानं हवेवर डोलून आपल्या अस्तित्वाची सुखद साक्ष देत होती.
दवबिंदूंचं सुद्धा ओझं व्हावं इतकी ती डहाळी अलवार होती. पण ती उगवली होती....जगली होती.........वाढत होती...हे फार अप्रूप होतं! निदांच्या द्रष्ट्या सिद्धातांना आलेले ते एक दृष्य यश होते.


६-सप्टें-५२७०

खूप गाढ, गहिर्‍या निद्रेतून हळूहळू जागं झाल्याप्रमाणे निलोने डोळे उघडले.
तिला स्थळकाळाचं काही भानच नव्हतं.
सगळ्या संवेदना जणू गोठून गेल्या होत्या. ...........
मन बधिर होतं. ............

सुमारे आठवडा भराच्या कालावधी नंतर ती बरीचशी ठीक झाली. तिच्या हिल्चीप च्या कमांड्स कार्यान्वित झाल्या. आणि तिला आपल्या अस्तित्वाची, इतिहासाची रोमांचीत करणारी जाणीव झाली.
..............

बाजूच्या कूपेत निद्रिस्त असलेल्या केवलकडे तिने मान उंचावून दृष्टिक्षेप टाकला. तिच्या तपकिरी डोळ्यांत स्मिताची एक लकेर उमटली. तिने हलकेच केवल ला "वेक अप" कॉल दिला.
धरतीला पुन्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी नव्या समर्थ पिढीच्या हातात सूत्रे देणे तिचे विहीत कार्य होते, तिने आवश्यक त्या सूचना आत्मविश्वासाने फ़ीड इन करायला सुरुवात केली.




ती नव्या युगाची प्रसन्न पहाट होती.





टीप: वाचकहो, तुमच्या पेशन्स बद्दल आभार. यातल्या सगळ्या तांत्रिक, साहित्यिक आणि इतर त्रुटींबद्दल मी आधीच क्षमा मागते.
ब्लॉग कसंकाय , आभार!

Monday, January 21, 2008

अंतीम युद्ध

आजवर अनेकदा तिने निदांच्या प्रयोगावर विचार केला होता.त्याचे सगळे महत्वाचे टप्पे अभ्यासले होते.

बाहेरच्या इझी चेअर वर बसून तिने तिचा अपडेटर कानाला लावला.
(अपडेटर : जगातल्या लेटेस्ट घडामोडींची बित्तंबातमी सांगणारा प्रोग्रॅमेबल फोन)

वनस्पती ज्या तंत्राद्वारे कार्बन डाय ऑक्साईड आत घेतात तेच तंत्र वापरुन निदांच्या शास्त्रज्ञ सहकार्‍यांनी काही CO2 सिंक्स निर्माण केली होती.
त्याच रिऍक्शन द्वारे ऑक्सिजन उत्सर्जित होणे अपेक्षित होते.

हेच मास स्केल वर करण्यासाठी बॉम्ब्स टाकून साखळी प्रक्रियेद्वारे अधिकाधिक ऑक्सिजन कसा उत्सर्जित होईल ते पाहिले गेले होते.
अशा तर्‍हेने काही CO2 सिंक्स हळूहळू तयार होत होती.

अचानक तिचा अपडेटर थरथरु लागला. विशिष्ट बातमी असल्यास व्हायब्रेटर मोड वर जाण्यास त्याला प्रोग्राम करण्यात आले होते.
विरीताने उत्सुकतेने त्याच्या चिमुकल्या स्क्रीन कडे बघितलं.

"ट्रेस ऑक्सिजन फाऊंड निअर एकंकागुआ पिक ऑफ ऍंन्डीज...पॉसिबिलिटी ऑफ़ मोअर सच पॉईन्ट्स प्रेडिक्टेड!"

विरीताने अधिर मनाने ती न्यूज पुनःपुन्हा वाचली.
तिचे हात भावनातिरेकाने गार पडले. हॄदय धडधडू लागले. केवलच्या आठवणीने भरून आलेले डोळे तिने निग्रहाने पुसले.

Wednesday, January 09, 2008

अंतीम युद्ध

टीप : कार्बन सायकल :
हवेतील कार्बन डाय ऑक्साईड वायू सोडण्याचे व पुन्हा ऍब्सॉर्ब हॊण्याचे चक्र. वाढत्या औद्योगिकिकरणामुळे व बेफ़िकिर,अनिर्बंध प्लास्टिक,पेट्रोल वापरामुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण लक्षणीय रित्या वाढते आहे. त्यामुळे पृथ्वीला आतील उष्णता बाहेर न जाऊ देणारे एक घातक आवरण तयार होते आहे.
त्यामुळे आपली पृथ्वी हळूहळू पण निश्चित पणे तप्त होत आहे. गेल्या ५० वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान .६ डिग्रीज ने वाढले आहे. हे असेच चालू राहिले तर एक दिवस वाढत्या तापमानामुळे पृथ्वीवरचे सारे जीवन धोक्यात येईल. म्हणून ही साखळी नियंत्रित करुन उलटी फिरविण्याची गरज आहे, जेणेकरुन, पृथ्वीवर ऑक्सिजन- ओझोन चे प्रमाण वाधेल व संतुलन होईल.
हे अर्थात आपणा सर्वांच्या सवयी, विचार आचाराच्या पद्धती, समज यांत आमूलाग्र बदल केल्यासच शक्य होणार आहे.
(पण इथे मी, ते शास्त्रज्ञांनी काही उपकरणांद्वारे व तंत्रज्ञानाद्वारे, मशीन्स ने अंमलात आणले असे दाखविले आहे.)
थोडाफार ऑक्सिजन कृत्रीम रित्या बनविणे शक्य होईलही ...पण पूर्ण साखळी च उलटी फिरविणे हे आपल्या वर्तणुकीवर अवलंबून आहे!



१० डिसें ५०३७

विरीताने क्षीण नजरेने खिडकी बाहेर बघण्याचा यत्न केला. त्या महत्वाकांक्षी प्रयोगाला आज तब्बल तीस वर्षे उलटली होती.

"म्हातारे झालो आपण आता..." ती मनाशीच उद्गारली.
ती हळूहळू चालत बाहेरच्या पोर्च मध्ये आली.

Thursday, January 03, 2008

अंतीम युद्ध

अतिशय एकाग्र चित्ताने निदांनी आपल्या जिओटेल वर सूचना फ़ीड इन करायला सुरुवात केली.
तर्काचा मापदंड लावून काढलेले निष्कर्ष आता प्रत्यक्ष पडताळले जाणार होते. हे फार अवघड काम होते.

शेकडो लोकांचा जीव पणाला लावून स्वीकारलेले हे एक आव्हान होते. कार्बन सायकल रिव्हर्सल च्या साईड इफेक्ट्स चे अनेक वेळा अभ्यासलेले सिम्युलेशन त्यांनी पुन्हा एकवार उघडले. व्हर्चुअल रिऍलिटी च्या सहाय्याने त्यांनी अनेक घटनांची चाचपणी आधीच केली होती. त्यासाठी करावयाचे प्रिव्हेंटिव्ह उपायही योजून ठेवले होते.
तरीही ते गंभीर होते.

सर्वच बाबतीत यशाची शाश्वती नव्हती.