Tuesday, August 25, 2015

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम



कविता महाजन यांचे ठकी आणि....हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. मराठीतील प्रवाह बदलेली आणि धाडसी कादंबरी - तीही एका लेखिकेने लिहीलेली असे नुसते तिचे वर्णन करुन तिला न्याय दिल्या सारखे आणि तिची दखल घेतल्या सारखे होणार नाही म्हणून ही सविस्तर समीक्षा.
खरे तर ह्या पुस्तकाचा दोन- तीन अंगांनी विचार करायला हवा. एक म्हणजे, तिचा फॉर्मॅट अथवा आकृती बंध. ही नक्की एक कादंबरी आहे, आत्मचरित्र आहे की निवेदनात्मक काल्पनिका आहे याच भोवर्‍यात वाचकाला खिळवून ठेवण्याचे काम पहिली शंभर-दिडशे पानं करते. दुसरे म्हणजे तिचा गाभा किंवा कथासूत्र आणि तिसरे म्हणजे लेखिकेची खिळवून ठेवणारी कथनाची हातोटी व पकड!
या कादंबरीची (सोयी साठी म्हणूया – कादंबरी!) नायिका- पद्मजा सप्रे- एक गाजलेली चरित्र अभिनेत्री . तिने प्रामुख्याने आईच्या भूमिका केलेल्या आहेत. पण तिचे व्यक्तिमत्त्व तिने केलेल्या भूमिकांच्या विरुद्ध आहे...म्हणजे सोज्वळ- सात्विक असे मुळीच नाही. ती एक धडाडीचे निर्णय घेणारी, मदिरा आणि (मदिराक्ष?) यांत बुडालेली स्वैरिणी आहे. तिच्या व्यक्तित्वाचे, तिच्या आजूबाजूला वावरणार्‍या माणसांचे आणि घटनांचे वर्णन आणि परिचय करुन देण्यातच पहिली दिडेकशे पाने संपतात. त्या भागाच्या शेवटी ती आत्मचरित्र लिहीण्याचा निर्णय घेते..व पुस्तकातच एक स्वतंत्र आत्मचरित्र – ’कळसूत्र’ नावाचे पुस्तक (मुखपृष्ठ- मलपृष्ठा सहित – एंबेडेड!) सुरु होते.    
त्यात पुन्हा तिचे लहानपण, आईचा अबोल, स्वार्थी स्वभाव व बाहेरख्याली वृत्ती व त्यामुळे हिच्यावर (न) घडलेले संस्कार याचे (पुनरुक्त) वर्णन येते. लहानपणची गरीबी, वडिलांच्या मृत्यूनांतर झालेले हाल, आईबद्दल तिला वाटणारा राग व द्वेष, तिचे मित्र - प्रियकर, तिच्या मोलकरणी, अभिनेत्रींमधील स्पर्धा- हेवेदावे, तिची असफल लग्ने, नाटक- सिनेमाचे अधांतरी विश्व, तिने बापाशिवाय मुलीला - अनाहिताला- जन्म देण्याचा घेतलेला निर्णय , दारु व पैसा, तिचे घारे –हिरवे डोळे व असामान्य रुप - त्यामुळे मिळालेले बरे वाईट अनुभव....यांचा धांडोळा घेत आत्मचरित्र संपते....
नंतर तिसरा भाग सुरु होतो- आत्मचरित्रा नंतर.-
हे थोडेसे एपिलॉग सारखे -  म्हणता येईल. त्यात तिच्या घसरत्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडलेला आहे. शिकून वकील झालेली अनाहिता- तिचे दिल्लीला जाणे- पद्मजाचे एकाकीपण, कुणी सरदेशमुख नावाच्या उद्योगपतीचा....आधी आत्मचरित्रात न आलेला उल्लेख-  - तिने त्यांचा उल्लेख पुस्तकात केला असेल की काय या भीतीने  – अगदी हार्ट ॲटॅक येईपर्यंत- व्यथित झालेला सरदेशमुख...
लेखिकेला तिचे प्रियकर कमी वाटले की काय नकळे, पण पुन्हा दोन तीन पात्रं आणली आहेत. डॉ. अरविंद - चांगला प्रथितयश, उच्चभ्रू डॉक्टर, घरदार- बायको असणारा..... हिच्या प्रेमात आकंठ - पण जपून जपून वागणारा......... तिला सत्तर लाखाची गुलाबाच्या आकाराची पर्स देणारा श्रीमंत  डॉकटर..आणि स्त्रियांना असं गोडी गुलाबीने, भावनिक आवाहन करुनच वश करावं लागतं अशी त्याची कारणीमिमांसा देणारा...डॉ. अरविंद   ...त्याची बायको ललीता...साधी , घरेलू, सेवाभावी!
तिला मदत करण्यास सदैव तत्पर असणारा दिग्विजय, अर्णव....आणि असे बरेच....
मग तिची झालेली विकलांग अवस्था, अल्झायमर ने स्मृतीभ्रंश झालेली पद्मजा, तिचे शून्य- संदर्भरहित विश्व, डॉ गायत्रीची लाभलेली साथ....ओसरलेले सौंदर्य व दुरावलेले चाहते.....

अशा वाटा वळणांनी कादंबरी अचानक एका अनपेक्षित , धक्कादायक वळणावर येऊन ठाकते.
वाचकाने कल्पनाही केली नसेल असे सत्य – सामोरं येतं. आपला कादंबरीचा वाचनाचा ॲगलच बदलून जातो. आधी बिनधास्त वाटणारी पद्मजा एकदम एकाकी , बिचारी होऊन जाते. पुन्हा पहिल्या पासून पुस्तक वाचून निसटलेले दुवे ह्या नवीन दृष्टिकोनातून तपासावेसे वाटतात. किंबहुना पुन्हा पुस्तक वाचून एका नव्या दृष्टीने तिच्या आयुष्यातील घटनांची आपण संगति लावतो...हे ह्या कादंबरीचे फार मोठे यश आहे असे मला वाटते.    
ते सांगून रसभंग करण्याचा मानस नाही.
या सगळ्या चढ उतारांत, नायिकेला कुठेही उदात्तता देण्याचा आणि ’करेक्ट’ ठरविण्याचा अट्टाहास दिसत नाही हे मात्र निश्चित उल्लेखनीय आहे. पण या प्रकारच्या कल्पनिका-कादंबरीला आवश्यक असणारी सलग, प्रवाही भाषाशैली, शारीर गोष्टींची धाडसी  मांडणी व सहज उल्लेख, एका नटीच्या जीवन चरित्रात अपरिहार्य असणारी अनैतिकता- तिचे केलेले संयत पण परिणाम साधेल व वातावरणनिर्मीती होईल असे वर्णन -  हे या पुस्तकाचे प्लस पॉईंट्स.
तसेच ह्या विषयाचा आवाका पेलणारी लेखिकेची पुस्तकावरील एक अदृश्य मजबूत पकड मात्र जागोजागी जाणवत राहते; जी विषयाला आणि कथावस्तूला इकडेतिकडे फटकू देत नाही. यामुळे कादंबरी मोठी असूनही तिच्यात एकजिनसी बांधीवपणा आलेला आहे.
एक वेगळा प्रयत्न आणि पारंपारीक कल्पनांना छेद देत एका लेखिकेने धीटपणे मांडलेला एका अभिनेत्रीच्या आयुष्याचा प्रवास व तिच्या समांतर जीवनकथेची न लागणारी संगती अनुभवण्या साठी  म्हणून हे पुस्तक वाचायला हवे.

Thursday, January 15, 2015

तुझ्यात जीव गुंतला

अमिता आणि निनाद....खूप जवळचे मित्र...कॉलेजात, ट्रेकिंग मध्ये..हसण्या-बोलण्यातले अगदी जीवश्च कंठश्च.....
कॉलेज नंतर निनाद औरंगाबादला गेला नोकरीला आणि अमिता पुण्याला ....पुढे शिकायला.
पण एकमेकांना नियमित पत्रं लिहीणे चालूच होते.  एकदा अशीच अमिता नागपूरहून पुण्याला येत असतांना मध्ये बस औरंगाबादला थांबली...निनाद ला ठाऊक होतेच की ती या बस मध्ये आहे. तो तिला भेटायला आला होता..तिला फार आनंद झाला त्याला पाहून...हाय हॅलो झाल्यावर तो म्हणे...की मला तुझ्याशी काही बोलायचे आहे...प्लीज रुमवर चल. तिने काही आढेवेढे घेतले पण निनादवरचा विश्वास इतका गाढ होता की ती त्याच्या आग्रहाला बळी पडून उतरली व रुमवर गेली. तिथे त्याने तिची काही पत्रे दाखवली ज्यावर अगदी भसाड्या अक्षरांत आय लव्ह यू असे लिहीलेले होते....प्रक्षिप्त.
ती चक्रावलीच. अमिताने असे काही लिहून पाठविल्याचा सपशेल इन्कार केला व ती परतली.
हे प्रकरण तिथेच संपले. नंतर निनाद ने तिला म्हटले की ते काहीही असले तरी मला तुझ्या कडून पॉझिटीव्ह उत्तर हवे आहे.....पण अमिता ला तसे कधीच वाटत नव्हते.....तिने नाही म्हटले....व तिच्या तर्फे त्या प्रकरणाचा पूर्ण विराम केला.
नंतर मात्र दोघांचेही मार्ग भिन्न झाले. अमिता एका उद्योग पतीशी विवाह करुन प्रतिष्ठीत घराण्याची सून बनली तर निनादनेही एका सुंदर मुलीशी लग्न करुन संसार थाटला...

२० -२१ वर्षांनी त्यांची गाठ अचानक एका मित्राकडे पडली. दोघेही थोडे अवघडले होते....
पण निनाद मात्र पुन्हा एकवार तिच्या प्रेमात पडला...त्याची जुनी आठवण पुन्हा जागी झाली...अमिताचे सदाबहार हसू, तिचा ऋजू समजूतदारपणा, वयाने जराही न बदललेलं तिचं तारुण्य आणि उलट स्थिरतेमुळे आणि अधिकाराने अधिकच खुललेलं तिचं रुप.......

निनाद ला अगदी वेडं व्हायला झालं होतं. तो तिला सारखे व्हॉटसॲप वर व फेसबुक वर मेसेजेस पठवू लागला.  . अमिता ने पहिल्यांदा त्याला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला की हे योग्य नाही. ती आता एका जबाबदार व्यक्तीची पत्नी आहे.....व तसेही तिने कधीही त्याच्यवर प्रेम केले नव्हते.  निनादही खरे तर हुशार होता, समजदार होता...पण तिच्या बाबतीत मात्र तो फार हळवा झाला होता....
अमिता ने त्याला परोपरीने समजाविण्याचा प्रयत्न केला....पण त्याचे एकच म्हणणे..की मलाही माहिती आहे की आपण आता एकत्र नाहीच येऊ शकत...पण मला फक्त तुझ्या बद्दलचे हे प्रेम व्यक्त करु दे. बाकी काही नाही...त्यामुळे मला खूप समाधान मिळते व आनंद मिळतो.
अमिता काळजीत पडली ...हे असे मेसेजेस तिच्या नवर्‍याने वाचले असते तर समस्या निर्माण झाली असती.....
अमिता मात्र त्याला कधीच प्रोत्साहन देत नव्हती....वेळोवेळी ती त्याला वस्तुस्थितीची जाणीव करुन देई...पण तो अधिकच गुंतत चालला होता.. प्रितीची ही रीतच न्यारी होती. कदाचित प्रेमाची ही ओढ त्याला स्वस्थ बसू देत नसेल. पण अमिताच्या हसर्‍या छबी, तिचे फ्रेश स्मितहास्य, तिची बांधेसूद कोवळीक त्याला वेड लावत होती हे खरे...म्हणजे आधी नसेल गुंतला इतका तो तिच्यात गुंतत चालला होता.

क्रमशः

Saturday, September 27, 2014

कंचनीचा महाल

मेहेकर येथे गावाबाहेर एक पडीक मोठा वाडा आहे. तो कंचनीचा महाल या नावाने ओळखला जातो. त्याबद्दल एक आख्यायीका आहे. कंचनी ही एक लावण्यवती आणि रूपाचा अहंकार असलेली गणिका. नदीकिनारी तिचा प्रासाद होता. घुंगरांचे श्रृंगाररसपूर्ण बोल तिथे कायम निनादत असत. अनेक सरदार- सेनापती तिच्या सौंदर्याचे दिवाणे होते. पलीकडे लोणार सरोवराच्या काठी असलेले देवीचे देऊळ . तिथे जळणारा नंदादीप ...हे सगळ्या गावाचे श्रद्धास्थान होते. एक सरदार पुत्र तिच्या प्रेमात पडला. तिने आपल्या बरोबर मंदिरात येऊन देवीचे दर्शन घ्यावे अशी त्याची आकांक्षा होती. पण कंचनी पडली आढ्यतेखोर, रुपसंपन्न कलावंतीण. तिला गाव उतरुन पलिकडे जाणे कमीपणाचे वाटले. ती वदती झाली... "मी नाही येणार तिथपर्यंत. माझ्या याच वाड्यात माडीवर माडी बांधून मी देवीचे दर्शन घेईन."... झाले........मजल्यावर मजले चढविण्यासाठी कारागिर राबू लागले आणि एके दिवशी...ती प्रदोष पूजा करायला व देवीचा दिवा पहायला वरती चढली...... कवी ना घ देशपांडे यांची नितांतसुंदर कविता..कंचनी चा महाल.....



अशीच होती रे निःशब्द मधुर ती रात्र राजसवाणी
असेच खोलात वाहत होते रे या पैनगंगेचे पाणी
सोसून गारठा चंचळ जळाच्या रुपेरी लाटांत न्हाले
आणखी अशी या पश्चिमे कडून चढून वरती आले
गारठ पदर कंपित अधर भरला कलश माथी
जमले होते रे आधीच वरती प्रदोष पूजेचे साथी
अंगाला लंपट झालेले माझे ते विरल वसन ओले
पहात होते रे वरून भाविक आतून कामूक डोळॆ
दूरच्या क्षितीजा वरती होता रे कोवळा ... क्रमश:

Monday, April 21, 2014

Heartfelt!

आज अगदी वैतागाचाच दिवस होता. सकाळी दूधवाल्याने एकदम साडेतीन लिटर दूध दिले....आज ऑफीस ला सुट्टी...त्याला सांगायचे राहीलेच. आता दही विरजून बांधा! नंतर पेस्ट संपली म्हणून कनकची आरडाओरड आणि झोप मोडली म्हणून रजत ची तार स्वरात तक्रार! अरे, काय मुलं आहेत का कोण ही! माझी मदतनीस , संध्या येणार होती दुपारी...तिच्या ’स्पेशल’ चकल्या आणि चिरोटे घेऊन तर बाईसाहेब आल्याच नाहीत....आजारी आहे म्हणे!....माझा भिशीचा प्लॅन होता गरम मटार कचोर्‍या, गरम शेव, दही-बटाटे व उसाचा रस...असा खास ’इंदोरचा’ मेनू ठेवणार होते..सराफ्यातल्या सारखा तर..... ! आता भेळ-आईस्क्रीम असा महाराष्ट्रीयन मेनूच ठेवावा लागणार बहुतेक. आणि बायका तरी काय...दागिने आणि पदार्थ आणि रिलेशन्स ...यावरच बोलतात. हिर्‍यांचे मंगळ सूत्र आणि कानातले ...मी नाही आणत म्हणे..नवराच माझा आणतो... काय काय.....त्यालाच आवड आहे! (?!) .... इतका हौशी नवरा आणि इतकी अरसिक बायको...?हॅलो...! काही लोकांचं संभाषण ऐकत होते...जर बायको काही दिवस कुठे गावाला गेली...” तर त्याचं काय...तो काय हाताने करुन खाईल काय...?” अरे!.....? हाताने करुन खाणे म्हणजे काय कमी पणा आहे? ती नाही खात ते रोज? मला असे बायकांना डॉमिनेट करणारे, कोत्या विचारांचे , कधीही कुणालाही चांगलं न म्हणणारे, सदैव स्वतःच्याच विचारात मग्न राहणारे लोक आवडत नाहीत अजिबात...... मानाचे भुकेले पण कर्तृत्वशून्य, कपबशी साधी उचलून सुद्धा न ठेवणारे, स्वयंपाक हा सर्वस्वी बायकांचाच प्रांत असे मानणारे पण टीका करण्यास पुढे असणारे, शिळं अजिबात न खाणारे, सदैव ही भाजी कशाची, काय , त्याने काय अपाय होतो, त्यात काय आहे....असा चुकीचा विचार करणारे, कुठलाही नवा पदार्थ चिवडत चिवडत संशयी वृत्तीने खाणारे, कर्मकांड करणारे, स्वप्ने पडल्यावर उठून तसे तसे कर्मकांड करणारे, भीत.......मला का अशा लोकांच्या सहवासात रहावे लागते......! देवा! कधी वाटते की मी निश्चित पणे याहून अधिक वर्थ होते ! कशा यांच्या समजुती! मुलांना काही काम सांगायला नको...मुलींनी केलेले चाले्ल. सतत सूचना, निगेटिव्हीटी, ....

Tuesday, April 01, 2014

नित्यक्रम - ३


सध्या मीना प्रभुंचं ’चिनी माती’ वाचते आहे. अफाटच सुंदर पुस्तक आहे. तसंही चीन बद्दल मला पहिलेपासूनच विलक्षण आकर्षण,ओढ आणि कुतूहल आहे. आणि मीनाताईंनी अगदी बारिक सारीक वर्णनांनी चीन आपल्या डोळ्यांपुढे साकारला आहे. चीन...भरताला जरबेत ठेवणारा आपल्यासारखाच आपला प्राचीन शेजारी...काही बाबतीत आपल्या सारखाच...लोकसंख्या, भूगोल आणि संस्कृतीच्या विपुल छायेत. पण बर्यााच बाबतीत आपल्या पेक्षा भिन्न....स्वयंशिस्त, देशप्रेम, काटेकोरपणा, स्वच्छता....किती दाखले द्यावेत! इतक्या मोठ्या भौगोलीक विस्ताराला आव्हान न मानता संधी मानून विकास करणारा, कठोर कम्युनिस्ट तत्वांची कास धरुन प्रगती करणारा एक फोकस्ड देश! मला एकदा जायचंच आहे चायना ला. कनक रजत ची नुसती धम्माल चालली आहे. मनसोक्त टीव्ही, नेट आणि गेम्स....आईसक्रीम्स (एकाला बटरस्कॉच व एकाला चॉकलेट.....आपापली वगळून दुसर्‍या कुठल्याही फ्लेवर ला हात लावणार नाहीत...अगदी व्रतस्थ असल्यासारखी ! द्वाड कार्टी! एकाला चायनीज प्रिय आणि एकाला पिझा, बर्गर. एकाला बटाट्याची रस्सा भाजी तर एकाला काचर्‍या. एकाला साबुदाणा खिचडी आणि एकाला थालिपीठ.....घर म्हणजे काय हॉटेल आहे का? ऑर्डर द्यायला? आणि मी कोण? वेटर? मला वाटतं मी कोण हा आदी प्रश्न अगदी सहजतेने सुटला आहे माझ्या बाबतीत!

Tuesday, March 25, 2014

रोजनिशी २


हं..माझा ‘नियमितपणा’ म्हणजे जर महिनाभरात एकदा असेल तर कठीण आहे...पण नसल्या पेक्षा हे बरे नाही का?  कनक - रजत च्या एक्झाम्स आटोपल्या नं आज! हुश्श...! पेपर्स तर यांचे ’भारीच’ जातात....डोकं आपलं ’हलकं’ होतं ना पण! आदिही आला परवा परत...येतांना काय काय आणलंन...मी कितीदा सांगते की नको रे ते टॉब्लेरॊन, गॅजेट्स, बेल्जियम चोकोलेट्स, पर्फ्युम्स , शांपूज, झुळझुळीत टी शर्ट्स असलं आणूस...मुलं जाम मिस्युज करतात..पण ऐकत नाहीच! आणि आल्यावर फर्माईश काय तर थालिपीठ, दही, मिरचीचं लोणचं आणि साईडला तळलेला पापड.....मुलांना नकोच हे...त्यांना बर्गर आणि पिझा! आईंना खिचडी-तूप आणि मला...सर्व! मला असं हे टिपीकल गृहिणी स्वगत इथे लिहायचंच नाही खरे तर ! माझ्यातल्या सर्जनशील, प्रातिभ ..(वगैरे वगैरे...)...स्व ला उमलवायचं आहे ना! तसे मला रंग खूप आवडतात..सगळे...प्रसन्न हिरवा, (मोरपंखी रंगाचं तर मला नाव सुद्धा खूप आवडतं) भडक लाल, सौम्य गुलाबी, झळाळता सोनेरी आणि सदाबहार जांभळा......पण होळी खेळायला मात्र आवडत नाही....रंग असे ओबडधोबड पणे माखल्यावर नाही चांगले दिसत माणसांच्या चेहेर्यारवर ..आणि विशेषतः बेभानपणे खिदळणार्याा, उन्मत्त, अनुचित तरुणाईवर... .त्याला चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरणारी हळुवार भावुकताच पाहीजे....किंवा निसर्गाच्या ’डिफॉल्ट’ चित्र चौकटीची उत्कटता..फुलापानांची, डोंगर-दर्यां्ची आणि पाण्याच्या लहरी लहरींची..!

Sunday, March 02, 2014

लेखना मागची प्रेरणा......

आपण का लिहीतो......


मेघनाने हा प्रश्न विचारल्या पासून जरा विचार केला.. तोवर तर असं काही सुचलंच नव्हतं.

खरेच, मी विचार करतेय कधीपासून! का लिहावसं वाटतं आपल्याला?

ही उर्मी तशी फार आधीपासूनचीच...कॉलेज च्या वार्षिकांकातले लेखन, त्याही आधी निबंध स्पर्धांमध्ये मिळवलेली बक्षिसं, आणि मैत्रिणींना भरभरून लिहीलेली पत्रं...
पावसाच्या धारांबरोबर लिहीलेल्या अनेक कविता..पण मग हातातून धागा सुटत जावा तशी हीही सुटत गेली कधीतरी...परवा परवा ब्लॉग सापडेपर्यंत...

काय असते ती उर्मी? मनातल्या भावना, विचार अधिकाधिक समर्पकतेने व्यक्त करता यावेत ही असोशी? की भाषेच्या लालीत्यपूर्ण अलंकारांचा साज चढविण्याचा निव्वळ अट्टाहास?
की आपल्याला जे वाटते ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचा खटाटोप?

काही असो...लेखन आनंद देते मात्र. निखळ. काही सुचत नसते तेव्हा थोडी हूरहूरही! कुणाचे उद्देश निरनिराळे असू शकतात, पण मला तर ते फक्त माझ्या स्वतः च्या आनंदासाठी मीच लावलले एक झाड आहे असे वाटते. आणि लेखन म्हणजे तरी काय...वाचनाचे पडलेले प्रतिबिंबच ना? खूपदा तर मला सुंदर काही वाचायला मिळालं की त्याची दाद देण्यासाठी लिहावसं वाटतं! लोक इतकं देखणं, लोभावणारं कसं काय लिहू शकतात?
इतकी समृद्ध आपली मराठी, तिचे इतके झळाळते पैलू आणि तिला लाभलेले अनेक गुणवंत लेखक व कवी..किती आनंद आहे आयुष्यात!


अंतःप्रेरणा म्हणतात नं तशी. मनातून लडी उलगडत जातात..एकावर एक..शब्दांचे साज लेवून कविता पुढ्यात ठाकते, निर्मीतीचा आनंद याहून काय वेगळा असतो?