Friday, August 19, 2022

जिंदगी गुलजार है... (गुलजार यांच्या वाढदिवसा निमित्त)

 

एक ही ख्वाब कई बार...

प्रेमात पडलं आणि मनासारखा जोडीदार मिळाला की मग सुरू होतं स्वप्नरंजन! कधी एकट्याने, तर कधी जोडीदाराबरोबर, कधी रात्री झोपेत, किंवा कधी चक्क दिवसाउजेडी ! स्वप्नांना सीमाच नसल्यामुळे आपल्या त्या वेळच्या मनस्थितीनुसार , परिस्थितीनुसार , ऐपतीनुसार प्रत्येकालाच स्वप्न पडत असतात. गुलजार साहेब हे काय रसायन आहे हे आपल्याला माहित आहेच. शालीन, तरल रोमान्स आणि त्यातही थोडा नटखटपणा ही त्यांची वैशिट्य. "किनारा" चित्रपटातलं एक ही ख्वाब देखा है कोई बार मैने हे नायकाने पाहिलेल्या त्याच्या स्वप्नाबद्दलचं गाणं गुलजारांच्या सगळ्याऽऽऽ वैशिष्ट्यांसह अवतरतं! 🥰

धृवपदाची ओळ ही इतकीच आहे. मग, त्याने अनेकदा पाहिलेल्या स्वप्नाबद्दल लगोलग नायक सांगायला लागतो आणि म्हणतो, तूने साडी में उरस ली है चाबियां मेरे घर की!! पहिल्या कडव्यातल्या पहिल्याच वाक्यात आपली विकेट जाते! ☺️काय कमाल कल्पना आहे पहा! एकाच वाक्याचे केवढे सोपे आणि तरीही गहन अर्थ आहेत! प्रेयसीकडे त्याच्या घराच्या किल्ल्या आहेत- म्हणजेच त्याच्यावरचं तिचं स्वामित्व त्याने खुशीने मान्य केलं आहे... स्वत:सकट संपूर्ण घराला त्याने तिच्या स्वाधीन केलेले आहे! बरं, तिनेही किल्ल्या नुसत्याच घेऊन पर्समध्ये नाही ठेवलेल्या... तिने उरसली है चाबियां! उरसना म्हणजे खेळणे, चेंडू जसा आपण एका हातातून दुसऱ्या हातात वर-खाली करत खेळतो, तशा ती त्याच्या घराच्या किल्ल्यांशी खेळ खेळत आहे... याचाच अर्थ, तिनेही त्याच्यावरचा आणि त्याचा घरावरचा स्वत:चा हक्क मान्य केलेला आहे, अगदी सहजगत्या! हेच तर स्वप्न प्रेमी जीव पहात असतात ना- एका घरात एकत्र राहायचं! या साध्या ओळीचा इतका multi layered अर्थ आहे महाराजा... कारण ते आहेत गुलजार! अशीच प्रत्येक ओळ वेधक आहे, सोप्या समजणाऱ्या भाषेत लिहिलेली, पण त्यातूनही खूप काही सांगणारी... याच गाण्यातल्या माझ्या आणखी एका आवडत्या ओळीबद्दल सांगते...

’...और बिस्तर से कई बार जगाया है तुझको. सहसा जेव्हा पुरुष स्वप्न बघतो, तेव्हा तो लोळत असतो आणि त्याची प्रेयसी त्याच्याजवळ येऊन, गोड बोलत, लाजत त्याला उठवते. मग तो तिलाच जवळ ओढतो, मग त्यांचे प्रणयाराधन वै वै 😛हे क्लिशे दृश्य गुलजार किती सहजतेने रिव्हर्स करतात! इथे, तो 'तिच्या आधी' उठला आहे, तो तिला खूप उशीरापर्यंत झोपायची मुभा देतोय आणि मग तिला जागं करतोय.. एकदा नाही, अनेकदा घडतंय हे त्यांच्यात! बाईने उशीरापर्यंत लोळत राहणं, म्हणजे किती भयंकर पाप समजलं जातं, अजूनही, हे माहित आहे ना? त्या पार्श्वभूमीवर, १९७६मध्ये काय कमालीचं रोमॅंटिक आणि forward आहे हे! Again, so much in so little! Salute boss.

गाण्यातलं शेवटचं कडवं म्हणजे परत एक सिक्सर आहे. तो म्हणतो, जब तुम्हारा ये ख्वाब देखा था, अपने बिस्तर पे मैं उस वक्त पडा जाग रहा था. यातली जाग रहा था हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. जे स्वप्न आपण झोपेत पाहतो, त्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. आपण सगळेच अतिशय रॅन्डम स्वप्न पाहतो. पण जागेपणी जी स्वप्न पाहिली जातात ना, त्यांना वास्तवाचं कोंदण असतं. त्यामुळेच, जेव्हा नायक म्हणतो, की आपल्या दोघांच्या साध्या, सोप्या पण प्रेमळ सहजीवनाचं मी स्वप्न पाहतो, जागेपणी पाहतो, आणि तेही कई बार तेव्हा तो या नात्यात किती खोलवर गुंतलेला आहे, किती committed आहे हेच दिसतं, हो ना? 💘

Friday, August 05, 2022

मथुरा गमन

 

आज गोकुळात गडबड उडाली होती..  गोपिका कुजबुजत होत्याजाणार म्हणतात! कृष्ण जाणार?

 गोकुळ सोडून? खरेच?

पण मग ? माता यशोदा आणि त्याचे सवंगडी आणि गायी? आणि आणि राधा..? तिचे काय?

सगळे नुसते प्रश्न.  घाबरवणारे, धास्तावणारे. व्याकुळ करणारे.

पण..आपण  थांबवू ना त्याला.  असा कसा जाऊ शकतो तो? आपल्या सर्वांना सोडून?

अगं..पण तो? तो  तर सूर्याचा कवडसा, तो तर चंद्र्किरण!  त्याला कसं थांबविणार आपण?

आणि राधा?

ती  सुदूर यमुनाकिनारी भान विसरुन एकटीच झाडाखाली बसली होती.

व्याकुळ, क्लांत पण तरीही आश्वस्त! मनोमन त्याचे जाणे समजून घेतलेली.

 

तिच्यासाठी तो परका नव्हताच !  तिच्या श्वासा-मनाचा भागच नव्हता का तो?

तो कुठे जाणार तिला सोडून? तिच्या अस्तित्वाचाच तर तो एक हिस्सा! तिच्या असण्याचाच तो पुरावा. तिचीच दुसरी प्रतिमा. 

छे! उगीचच बावरल्या सगळ्या . ती किंचित हासली.

त्याच्या आणि तिच्या अतूट भावबंधाची तिला पुन्हा एकवार खात्री पटली होती.

Saturday, April 23, 2022

 गौरी देशपांडे -अनया

आपण बहुतेक सगळे ठरावीक प्रकारचं, ठरावीक पठडीच आयुष्य जगतो. कुटुंबाची प्रेमळ आणि भक्कम चौकट, थोडा धाक- थोडे लाड असं लहानपण. शिक्षण - अर्थार्जन -लग्न. मग वंशवृद्धी. त्या आणि बाकी संसाराच्या जबाबदाऱ्या. किराणे - भाज्या- बँका - रुपये पैसे - कामवाल्या - तब्येती - आजारपणं, एक आणि दोन. पुढचं सगळं सारखंच. आपली मुलबाळ मोठी होतात आणि आपण म्हातारे. मग फक्त भूमिकेत बदल होतात. बाकी सगळा त्याच तिकिटावर तोच खेळ. पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्षे चालूच.

ह्याचा अगदीच कंटाळा आला तर आपण पुस्तकं वाचतो, प्रवासाला जाऊन तिथे जाऊन आल्याचा पुरावा म्हणून फोटोबिटो काढतो. फारच धाडस दाखवायची हुक्की आली, तर डोंगर-दऱ्या-समुद्रकिनारे गाठतो.

बहुतेकांच आयुष्य ह्याच मार्गावरून जातं. ह्या मार्गात प्रेम-माया-जिव्हाळा-वात्सल्य वगैरे महत्त्वाचे थांबे असतात. तेही ठराविक साच्यातले. विशिष्ट प्रकारचे. आई-वडिलांनी मुलांवर करायचं प्रेम, नवरा बायकोनं एकमेकांवर करायचं प्रेम, भावा-बहिणींनी एकमेकांवर करायचं प्रेम वगैरे वगैरे. ही प्रेमं अशाच कोष्टकातल्या पद्धतीने, ह्याच व्यक्तीवर का करायचं? हा विचार आपल्या मनात येत नाही. कारण ह्या प्रेमाचे गोडवे ऐकतच आपण लहानाचे मोठे झालेले असतो.

ह्या प्रेम करण्यातली बंधनही आपल्याला उपजत कळतात. त्यामुळे आपण लोकं प्रेमातही सावध असतो. हो, समाजमान्य नसलेल्या जातकुळीतल्या एखाद्या प्रेमाची चूक आपल्याकडून घडायला नको. जीव उधळून, सर्वस्व पणाला लावून, बंधनं झुगारून निखळ प्रेमासाठी प्रेम करण्यात काय सुख मिळत, ह्याची कल्पना नसते आणि चुकीच्या प्रेमाच्या परिणामांचे चटके सोसण्याची तयारी तर अजिबात नसते. त्यामुळे आपलं 'धोपटमार्गा सोडू नको रे' आयुष्य आपल्याला नेमस्त रस्त्यावरून नेत राहतं.

पण जगात थोडीशी अशी माणसं असतात, की जी ह्या चौकटीच मानत नाहीत किंवा ह्या चौकटी त्यांच्यासाठी नसतातच. ह्या लोकांचं प्रेम 'असत'. ते हिशेब मांडून प्रेम 'करत' नाहीत. ही माणसं प्रेमासाठी काहीही पणाला लावायची तयारी ठेवतात. सर्वस्व उधळून द्यायला मागेपुढे बघत नाहीत. त्यांना त्या प्रेमाची वीज हातात घ्यायचीच असते. त्यापायी स्वतःचा कोळसा होईल, हे माहिती असलं तरीही आणि कदाचित म्हणूनच....

ही अशी माणसं आपल्याला गौरी देशपांडे ह्यांच्या पुस्तकातून भेटतात. वेगळीच असतात ती. पण गौरीही तशीच होती. अत्यंत बुद्धिमान. प्रखर, ठाम विचारांची पक्की बैठक. ते विचार तिचे स्वतःचे. दुसऱ्याला बरोबर वाटतात किंवा सगळे म्हणतात म्हणूनचे नाहीत. अतिशय मनस्वी, खूप वेगळं आयुष्य ती जगली. वाचलं, लिहिलं, आणि जाताना आपल्या 'बे एके बे' प्रकारच्या जगण्यात थोड्या ठिणग्या टाकून गेली.

इरावती कर्वे आणि दिनकरराव कर्वे ह्यांची ती मुलगी. महर्षी कर्व्यांची नात. ह्या कर्वे मंडळींच्या रक्तामध्येच मळलेली वाट न तुडवता आपल्याला खुणावणाऱ्या ताऱ्यामागे जाण्याचे गुण होते बहुधा. स्त्रीशिक्षणापासून, कुटुंब नियोजन, पुरातत्त्वशास्त्र, पर्यावरण सगळी क्षेत्र ह्या मंडळींनी गाजवली. इरावतीबाई आणि दिनकररावांच्या घरी मोकळं वातावरण होतं. एकोणीसशे चाळीसच्या दशकात जाई, आनंद आणि गौरी ही भावंड आपल्या आई- वडिलांना 'इरु' आणि 'दिनू' अशा नावाने हाक मारत असत!

गौरीने मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषांत मोजकं पण नसेवर नेमकं बोट ठेवणारं लिखाण केलं. कविता, लघुकादंबरी, कादंबरी असे अनेक साहित्यप्रकार हाताळले. 'आहे मनोहर तरी' 'अस्वस्थ दशकाची डायरी' अशी काही मराठी पुस्तकं इंग्रजीत अनुवादित केली तर 'अरेबियन नाइट्स' मराठीत अनुवादित केलं. आत्मचरित्र लिहिलं नसलं, तरी आहे हे असं आहे, कारागृहातून पत्रे, विंचुर्णीचे धडे अशा काही लेखनातून तिच्या आयुष्यातले हिंदोळे कळतात. तिची एकूण नऊ मराठी पुस्तकं आणि इतर काही लेख अशी मराठीतली साहित्यसंपदा होती.

गौरीची पुस्तकं प्रथम वाचली, तेव्हा मी काही दहावी - बारावीच्या वयात असेन. आमची वाचनाची साधना तेव्हा कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयात व्हायची. पुस्तकांचा ढीग असायचा. त्यातून जे रत्न तुमच्या हाताला लागेल ते तुमचं. लेखकानुसार वर्गीकरण वगैरे लाड नव्हते. त्यामुळे कुठल्या पुस्तकानंतर कुठलं पुस्तकं हातात येईल, ह्याला काही ताळमेळ नव्हता.

बऱ्याच कादंबऱ्या वाचायचे मी तेव्हा. दिवास्वप्न बघायचं वय होत माझं. कादंबरीतील नायिकेच्या जागी स्वतःची कल्पना करताना गुदगुल्या व्हायच्या. नायिकेचे नायकासाठी नटूनथटून तयार होणे, गरम वाफाळता चहा, खोबरं-कोथिंबीर घातलेले पोहे आणि मराठी कादंबरीकाराला झेपेल असा आणि इतकाच रोमान्स; अशा पुस्तकांनंतर गौरीच पुस्तक म्हणजे माझ्या मनातल्या प्रेमाच्या गोडच गोड कल्पनांवर पडलेला बॉम्बं होता. ह्या नायिकांच्या जागी स्वतःची नेमणूक करणं काही माझ्या मध्यमवर्गीय चौकटींना झेपण्यासारखं नव्हतं.

तेव्हा जगरहाटीशी ओळख व्हायची होती. त्यामुळे त्या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टी, गोष्टी म्हणून आवडल्या. पुस्तकात वारंवार येणारे परदेशाचे, पाश्चात्त्य साहित्य आणि संगीताचे, तिथल्या अॅलिस्टर, दिमित्री, इयन, तेरुओ अशा वेगळ्याच नावाच्या माणसांचे उल्लेख आणि एकंदरीत बिनधास वातावरण तेवढं लक्षात राहिलं. लिहिलेल्या शब्दांव्यतिरिक्त जे लिहिलं होतं, त्याची जाणीव व्हायला बरीच वर्षे जावी लागली. जगाचे थोडे टक्केटोणपे खाऊन निबर व्हावं लागलं.

गौरीची पुस्तकं नायिकाप्रधान असतात. तिच्या सगळ्या नायिका ह्या सुस्वरूप नसतात. किंवा असं म्हणूया, की त्यांना त्यांच्या रूपाची फिकीर नसते. कारण त्यांच्या आसपासच्या लोकांना त्या सुस्वरूप वाटत असतात. त्यांच्यातल्या आत्मविश्वासाचं प्रखर तेज मात्र आपल्याला त्या छापील पानांमधूनही जाणवत. बहुतेक सगळ्या नायिका उच्चशिक्षित असतात. शहर सोडून खेड्यात गेलेल्या, शेतीवाडीची आवड असणाऱ्या असतात. अपत्य नसतात किंवा हातावेगळी होऊन स्वतंत्र राहणारी असतात. जन्माला येताना आपण जसं हात-पाय-नाक-डोळे घेऊनच येतो तशा ह्या सगळ्या स्वातंत्र्य घेऊनच आलेल्या असतात. आपण जिकडेतिकडे कोणीतरी कोणालातरी स्वातंत्र्य 'दिलेलं'ऐकतो, तसं कुठल्याही प्रकारच्या पुरुष नातेवाइकाने, म्हणजे बाप, नवरा, भाऊ, मुलगा इत्यादींनी ते त्यांना 'दिलेलं' नसतं.

गौरीच्या सगळ्या नायकांची नावं कृष्णाची आहेत. वनमाळी, यदुनाथ, माधव, जनक वगैरे. नायिकांची नावेही कृष्णाच्या आयुष्याशी संबंधीत आहेत, कालिंदी, राधा, जसोदा. कृष्ण सोळा सहस्र नारींचा स्वामी होता. सगळ्यांचं समाधान करून पुन्हा आपली कर्तव्य पार पाडणारा. कोणावरही अन्याय न होऊ देणारा. गोकुळात चोरून लोणी खाणारा, गोपींच्या मेळ्यात रासक्रीडा करणारा, द्रौपदीला वस्त्र पुरवणारा आणि अर्जुनाला उपदेश करणारा पूर्ण पुरुष. ह्या जगात असे कृष्ण सापडायला कठीण किंवा अशक्यच म्हणाना!

गौरीचे नायकही कृष्णासारखेच आहेत. बायकोला समजून घेणारे. तिच्या गुणांबरोबर तिचे अवगुण ते फक्त स्वीकारत नाहीत तर त्या अवगुणांवरही मनापासून प्रेम करतात. ह्या गुणावगुणांचे मिश्रण असलेल्या आणि त्यामुळे सगळ्यांहून वेगळ्या असणाऱ्या तिच्यावर खूप खूप प्रेम करतात. नायिकेचे आपल्याला पचायला कठीण जाणारे विचार, निर्णय आनंदाने स्वीकारतात. नायिकेबद्दल मनात प्रेम, आदर, ममता असणारे, तिच्यावर जीव टाकणारे आदर्श पुरुष तिच्या लेखनात दिसतात! आपल्याला आदर्श पुरुष वाटेल असा समजूतदार जोडीदार असला, तरी नायिकेच्या मनातलं चित्र काहीसं अपूर्ण असतं. ते परिपूर्ण करण्यासाठी बऱ्याच गोष्टींमधून तिचा सखा डोकावतो. द्रौपदीचा कृष्ण कोण होता? सखा होता तो. नवरा, बॉयफ्रेंड ह्याच्या मधली जागा घेणारा!

गौरीने लिहिलेल्या गोष्टींना सुरवात आणि शेवट असा नसतो. एक रुबाबदार, श्रीमंत आणि कर्तबगार तरुण एका सुंदर, शिकलेली आणि संसाराला लायक असलेल्या तरुणीच्या प्रेमात पडतो आणि थोड्याफार अडचणी येऊन शेवट गोड होतो, ह्या ठराविक साच्यात तर ह्या गोष्टी अजिबात बसत नाहीत. ह्या गोष्टींमध्ये काय नसतं? ह्यात विवाहबाह्य, समाजमान्य नसलेले प्रेमसंबंध असतात, नायकासाठी तत्त्वांना - निष्ठांना -स्वत्वाला मुरड न घालणाऱ्या नायिका असतात.

गौरीच्या नायिका त्यांच्या भावनांप्रमाणे शरीराशीही प्रामाणिक असतात. प्रेम करण्याची आणि करून घेण्याची गरज त्या अन्न, वस्त्र निवारा ह्या गरजांच्या एवढी आणि एवढीच महत्त्वाची मानतात. काहीवेळा ती गरज, त्या समाजाच्या रूढ नात्यांच्या पलीकडे जाऊनही पूर्ण करतात. त्याबद्दल त्यांना अपराधी वाटत नाही आणि स्पष्टीकरण द्यायची गरजही. गौरीच्या नायकांना मात्र ही मोकळीक नाहीये. हे वनमाळी आणि माधवच्या गोष्टीत दिसत!'तेरुओ' मधली नायिका 'लग्न झालं असलं तरी मी माझे काही अवयव, काही क्रिया आणि काही भावना जनकला विकल्या नाहीयेत' असं म्हणते. पण नमूला मात्र 'माझ्यात आणि वनमाळीमध्ये जे घडत, ते अजून कोणात घडू नये,' असं वाटत!

गौरीच्या नायिकेला मनात खोलवर बोचणारी अशी एक अतृप्तता असते. तृप्तीची तहान वाढवणारी अतृप्तता. चटकन चिमटीत सापडणार नाही अशी. तिच्या आयुष्यात आर्थिक प्रश्न असले, तरी ते टोकाचे नसतात. वरवर पाहताना सुस्थितीतील असणारी ती अस्वस्थ मात्र असते. तिच्या संवेदनाशील मनाला काहीतरी डाचत असत. ते नक्की काय डाचतंय, हा प्रश्न आपल्याला फार त्रास देतो. कधी ती नात्यातला खरा अर्थ शोधत असते, तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचा.

खूप हुशार असूनही गौरीची नायिका जगाच्या, व्यवहाराच्या पातळीवर यशस्वी नसते. तिला स्वतःच असं खास अस्तित्व नक्की असत. त्यावर लुब्ध असणारे पुरुष तिच्या अवतींभोवती असतात. पण तिला मात्र वेगळ्याच कशाचीतरी जीवघेणी आस असते. त्या उत्तराच्या मागे कितीतरी वेळा गौरीची नायिका नायकाचे अस्तित्व, त्याचा सहवास नाकारते. त्याच्या प्रेमाचे नाजूक, रेशमी, सुखकर आणि चिवट बंध तोडून टाकते. त्याच्यापासून, जगापासून लांब जाते, लपते. काहीशा नैराश्याच्या, आत्माविनाशाच्या रस्त्याला जाते असही वाटत.

मराठी साहित्याला स्त्री लेखिकांची मोठी परंपरा लाभली आहे. ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक ह्यांच्यापासून ते अगदी आजच्या कविता महाजन, मोनिका गजेंद्रगडकर ह्याच्यापर्यंत असंख्य स्त्रियांनी निरनिराळ्या पातळीवरून स्त्री आयुष्याच चित्र वाचकांपुढे उभं केलं. ह्या सगळ्या प्रभावळीत गौरीने केलेल्या लिखाणाच वेगळेपण काय आहे? त्याआधीच्या बऱ्याचशा साहित्यात स्त्रियांचे कौटुंबिक प्रश्न किंवा पुरुषी वर्चस्वामुळे निर्माण झालेले प्रश्न चर्चिले गेले होते. गौरीची पिढी ही स्वातंत्र्योत्तर पिढी होती. स्त्रियांपुढचे प्रश्न बदलले होते. संपले नव्हते. स्त्रीने शिक्षणासाठी, नोकरीसाठी घराचा उंबरठा ओलांडण्याची सवय समाजाला झाली होती. गौरीची पिढी ह्या प्रश्नांपासून पुढे आली होती. समाजाने स्त्रीकडे 'व्यक्ती' म्हणून बघावं अशा विचारांच्या प्रभावाखाली होती.

गौरीच्या लेखनात तिच्या मुक्त विचारांचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसतं. तिचं लेखन स्त्रीवादी असण्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्यवादी, व्यक्तिवादी होतं. वेगवेगळ्या पातळीवरचं प्रेम, त्या प्रेमाची मोजावी लागणारी किंमत आणि त्या प्रेमाच्या मर्यादा ह्याबद्दलचे विचार तिच्या लेखनात दिसतात.
'एकेक पान गळावया' किंवा 'निरगाठी' मधल्या नायिका आपल्या आईपणाकडे वस्तुनिष्ठ पातळीवरून पाहू शकतात. समाज प्रत्येक आईला आपल्या मुलांबद्दल जे प्रेम, वात्सल्य वाटायलाच हवं, अशी अपेक्षा करतो, त्याबद्दल प्रश्न उभे करतात. आईपणाच्या दडपणांची आणि मुलांमुळे आयुष्यावर येणाऱ्या मर्यादांवर मोकळेपणाने भाष्य करू शकतात. मातृत्वाचे गोडवे न गाता आईपण निभावताना येणारा कंटाळा आणि मोडणारी पाठ ह्याबद्दल अपराधी वाटून घेत नाहीत.

गौरीच्या साहित्याबद्दल जी चर्चा झाली, ती मात्र तिने रंगवलेल्या देशीविदेशी प्रियकरांबद्दल आणि नायिकेच्या शरीरसंबंधांबद्दल. गौरीच्या लेखनात ह्या शरीरसंबंधांबद्दल धीट भाष्य आहे. ह्या धीटपणामुळे गौरीवर 'बंडखोर लेखिका' हा शिक्का मारला गेला. ह्या सगळ्या वर्णनातून गौरीने स्त्रियांच्या मानसिक आंदोलनांबद्दल आणि तिच्या लैंगिकतेबद्दल जे भाष्य केलं होतं, त्याकडे मात्र दुर्लक्ष झालं.

गौरी देशपांडेंनी जे साहित्य लिहिलं, त्यालाही आता बरीच वर्षे झाली. स्त्रिया आता आर्थिक, सामाजिक, वैचारिक स्वातंत्र्य काही प्रमाणात तरी गृहीत धरू लागल्या आहेत. समोर येणाऱ्या विचारांना 'का?' हा प्रश्न विचारण्याइतका आत्मविश्वास त्यांच्यात आला आहे. पण तरी गौरीच्या 'कारागृहातून पत्रे' मधल्या नायिकेने एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जाण्याचं केलेलं 'जेलर बदलला, कोठडी तीच' हे वर्णन आजही तेवढंच लागू होतं. 'मुक्काम' मधली कालिंदी लग्न करताना 'होणाऱ्या नवऱ्यात चांगलं काय आहे, ह्यापेक्षा खटकण्यासारखं काही नाही' असा विचार करून त्याच्या गळ्यात माळ घालते. ह्याच विचारांनी जुळलेली कितीतरी नाती आपण आजूबाजूला पाहतोच.

गौरीच्या सगळ्या पुस्तकातून आपल्या मनात अंधुक स्वरूपात असलेले असे अनेक प्रश्न ठळक होतात. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, अनुभवांच्या वेगवेगळ्या वळणांवर हे प्रश्नही बदलत जातात आणि आपल्याला अस्वस्थ करत राहतात. कधीकधी ती पुस्तकं हातात धरायचीही भीती वाटेल, इतके त्रासदायक होतात. पण एकदा का गौरीच गारुड आपल्या मनावर झालं, की त्यातून सुटका अशी नाहीच. तो कॅलीडोस्कोप हातात धरून त्यात प्रत्येक वेळी वेगवेगळी दिसणारी जादुई नक्षी बघत राहणं इतकंच. बस....

माणसाच्या मनाला 'कोssहं' हा प्रश्न अनादी कालापासून सतावतो आहे. ' मी म्हणजे हा देह नाही. तर मग मी कोण?' अशा पद्धतीचा काहीतरी मूलभूत प्रश्न. ह्याच उत्तर नायिकेला मिळत नाही. पर्यायाने आपल्यालाही. गौरी ते उत्तर हातावर खाऊ ठेवावा, तितक्या सहजपणे आपल्यासमोर ठेवत नाही. ते ज्याने त्याने आपापल्या वकुबाप्रमाणे शोधायचं. हातात येतंय अस वाटत, तोच ते निसटतही. असा शोध घ्यायला लावणं, हेच गौरीच्या लिखाणाच सामर्थ्य.

Monday, January 03, 2022

Winter and Friendship...........

 



Its winter now and the seeds of love lie deep within me

Will spring come over?

I thought by now, I would have met another  ..But it was not to be.

But I can show the world that you were once mine

I can relive our time together

Those precious memories that I yearn to forget

Time slips through my fingers like sand 

The fires of our love have burnt out and now there is nothing, .............

nothing but a sky, Black with ashes

I won’t forget you...... Your kisses like soft fruit

Your laughter bursting into daylight like silver

Your smile like curve of the sickle moon in the night sky

Your luminous beauty..!!

Your goodness, your patience.

How you hung on my every word..

You are now in the arms of another

Who is he, this man?

Does he have poise?   Does he have grace?

Is he a lover or a fighter?

What powers does he have over you?

Do your eyes dance like  fireflies when he comes to you?

Does your body soften as your lips shape his name?

I can’t believe you are so selfish.

You are consumed by love.

How does he cast a spell over you?

Enchant you? Beguile you?

 

 

 

 

When I look back on the darkest moments of our history, I know that we would part..!!

And now I must let you go

We will know deeper, surer love..!!

It begins fleetingly but it deepens and endures

It grows amongst all the strangeness of life

It is a beauty we can always depend on

It is the beauty of Friendship..!!!

 


Wednesday, May 05, 2021

तुझे सरेना चांदणे

तुझी ओंजळ चाफ्याची, तुझे सोनसळी हसू,  
नको अशा सांजवेळी कुठे रस्त्यात दिसू !

तुझा हात हातामधे , असे जगणे घडते, 
मनातल्या वाटेवर तुझे पाऊल पडते !

दिस संपल्यावरही तुझी भूल इथे राही,  
घरभर दरवळती तुझे चाफा तुझी जुई !

राती रुंजी घालती तुझी छनक पैंजणे,  
चंद्र नभापलिकडे तुझे सरेना चांदणे ! 

डोळे काजळभरले कधी ठेव खांद्यावर , 
तुझ्या स्पर्शात मिळते माझ्या जन्माचे उत्तर !