Tuesday, November 11, 2008

राजस्थान

प्रशस्त, लांबवर पसरलेले पॅसेजेस, दुतर्फा लटकविलेली राजांची , राण्यांची चित्रं, वंशावळी, प्रसंग…मोठाली दालनं...आणि न संपणारा बहादुरीचा इतिहास....
पन्ना दाईने केलेला त्याग आणि वाचविलेला एकमेव वंशज..
उत्कट मीरा, तिची आजही जाणविणारी कृष्णप्रीत……..
राणा प्रताप…त्याचा प्रिय घोडा चेतक, पद्मिनीचे असामान्य सौंदर्य…त्यापायी घडलेल्या लढाया आणि सांडलले रक्त, केलेले स्वाभिमानी जोहार, ……….
उदयपूर हा अनमोल ठेवा वाटत राहतो.

मोठे मोठे किल्ले, वाडे, पॅलेस, हवेल्या….त्यातून उलगडत जाणारी जुन्य़ा ऐश्वर्य संपन्न इतिहासाची झलक, अगदी नियोजीत शहर वाटावे असे विस्तीर्ण प्राकार, महाल, खेळविलेले पाणी, जनानाखाना…राजवैभवी सभामंडप, अस्त्रं शस्त्रं, भोजनगृहे, एका रांगेतली गुलाबी घरं ………....
वीर योद्धे आणि त्यांच्या कथा...लखलखता शीश महाल, शाही जलमहाल……………………………………
जयपूरचे सौंदर्यवर्णन संपता संपत नाही

वाळवंटातील अवर्णनीय जादू, मन भारून टाकणार्‍या प्रेम कहाण्या, केसरीया बालमा……… ची अवीट सुरावट….अपरिचीत शब्द आणि ओळखीची धून, अनिवार्य पणे होणारी “लेकिन” आणि हृदयनाथ च्या संगीताची आठवण...सूर तर दूर दूर पर्यंत पसरलेल्या वाळूत रेंगाळलेले अजून….मनही तिथेच थांबून राहिलेलं…घेरदार घागर्‍याच्या रंगीत आरशांमध्ये ..

तंतुवाद्याची रुणझुणती साद, नक्षीदार पायर्‍या उतरणारी पावलं, त्या वैभवाने अचंबित झालेलं मन, सदैव पडद्याआड रहावं लागणार्‍या लावण्यवती राजस्थानी ललनांपेक्षा महाराष्ट्रीयन स्त्रिया कितीतरी पुढे असल्याचा दाटून आलेला अभिमान.
राजपुत वीर….त्यांची बहादुरी, शौर्य, प्रेम, भक्ती, समृद्धी… डोळे दिपविणारी कलाकुसर, चित्रकला, कोरीव काम, कपडे…. इर्षा, दुष्मनी, व्यापार…………………….

हळदी रंगाच्या दगडावर कोरलेली अप्रतीम शिल्पं..............उधाणलेला वारा आणि बारीक उडणारी मुलायम वाळू..
तहान तहान झालेला कंठ आणि बोअर चं खारं पाणी....
पिवळ्या धुळीत वेढून राहीलेलं सुवर्ण शहर जैसलमेर विसरणं शक्य नाही.

राजस्थानच्या हाकेला "ओ" देऊन एकदा हे सारं अनुभवायला हवं.

Friday, October 24, 2008

दिवाळीच्या शुभेच्छा!

मित्रांनो

दीपावलीच्या तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा!
ही दिवाळी आणि नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, नवनवीन प्रतिभेच्या उन्मेषांचे, कृतिशील विचारांचे आणि प्रेरणेचे जावो!



अश्विनी.............

Wednesday, July 02, 2008

कंचनीचा महाल

तोच तो इच्छित दीपक दिसला काठाशी हासत आले
क्षितीजा पासून क्षितीजा पर्यंत आकाश कंपीत झाले
अहंते वर या ओवाळले रे मी पाचही हे प्राण माझे
भरून छातीत नेत्रांत धावले उन्मत्त उधाण माझे
ताठर नाचत होता रे माझ्या या भुवयां वरती माज
माथीचा चंद्रही बघत होता हा बुडून गेलेली सांज
तोच ती आली रे हाक त्या पोराची उभार ते हात होते
दाबून घट्ट हे अधर तरी मी समोर पहात होते
आतले कठीण्य तनूत आले रे तोच अन झाले मी काळी
कठीण पणा हा गोठून पडले दगड बनून खाली


माझ्या या महाला मधल्या प्रत्येक कमानी कमानी पुढे
वार्‍याच्या झुळूकी वरुन आत्ताच वाजत गेले रे चुडे
प्रत्येक रंगीत हातात होती रे उज्ज्वल दीपाची थाळी
प्रत्येक कपाळी शोभत होती रे मोत्यांची सुंदर जाळी
तुपाचे दीपक जाळून होता मी चांदवा धूसर केला
जेथून निघाले त्याच या भूमीचा संपूर्ण विसर केला
बाभळी वरल्या फुलांत आता मी सोसते पाऊस ऊन
आज मी आहे रे पाषाण होते मी कोमल कुसुमाहून
फुलले परंतु वाहिले नव्हते चंपक पुष्प मी ताजे
कळस लावून रितेच ठेविले मानस मंदिर माझे

खालच्या मैदानावर मी रात्रीत दुरात ऐकते टापा
ऐकते तमात एकाकी गुराच्या या भिंती जवळ धापा
कमानी कमानी मधून सारखा हुंकार देतात वारे
पाहत जातात भकास निळ्या या आकाशा मधले तारे
आतून लागते आच पण हा दगड पेटत नाही
सगळे पारखे दयेचे मायेचे कुणीच भेटत नाही
अंधार्‍या रात्रीत ती सारी नगरी तमात बुडते बाई!
मिटल्या दातांच्या ओसाड भिंती या बोलत नाहीत काही
पुनव येताच वासनामय मी दगडा मधून येते
महाला भोवती चांदण्या खालती तेच ते फेर मी घेते

कशी रे रंगवू आज मी राजसा ते चित्र पुसट लेले
पुनव रात्रीत माझे हे हिंडते मानस विस्कटलेले
दक्षिण दाराच्या बाहेर पडले अनेक शतके अशी
पाषाण मय हे अचल जिवीत सोशीत आहे मी पिशी
पडल्या शीळेला भेटला नाही रे कुणीच रंक वा राजा
मीच रे ऐकला मानव वांछेचा सुदीर्घ निःश्वास माझा
दोनच उरले मजले खालचे कुणीच नाही रे गडी
एकही कवाड नाही रे आणखी एकही नाही रे कडी
घुमतो पारवा झोंबतो गारवा वार्यात वाजते शिटी
सहस्त्र भुजंग बळाने राजसा एकच घाल रे मिठी !



समाप्त!


(ना घ देशपांडे या कविवर्यांविषयी अधिक माहिती मिळेल का?
इतके उत्कृष्ट लिखाण / काव्य करणारा कवि अंमळ दुर्लक्षित राहीला असे वाटते. कुणी यावर काही सांगू शकेल काय?)

इतकी दीर्घ कविता वाचाण्याचा पेशंन्स ठेवल्याबद्दल वाचकांचेही आभार

Friday, June 27, 2008

साहित्य संमेलन

"मराठी साहित्य संमेलन सन फ़्रान्सिस्कोमध्ये"

ही बातमी आनंददायी आहेच. मायमराठी साता समुद्रापार, देशांच्या सीमा ओलांडून नवे ध्वज रोवायला जाते आहे, याहून अभिमानाची गोष्ट काय असू शकते?

आणि आता तर ब्लॉग्जच्या, ई दळणवळणाच्या माध्यमातून जग एव्हढे जवळ आले आहे की इथे राहूनही आपल्याला संमेलनात सहभागी होता येईल. किंबहुना दर वेळेचे साचेबद्ध स्वरुप बदलून नवीन आयाम काय देता येतील याचा विचार व्हावयास हवा.

मराठी सोडून बाकी कुठल्या भाषेचे संमेलन इतक्या दूरदेशी साजरे झालेले आपण ऐकले आहे का? मग हा आपला सन्माननीय अपवाद नाही का?

माराठी सारस्वतावर प्रेम करणार्‍या आपणा सर्वांनाच मराठीला एक नवीन पैलू देण्याची ही एक सुवर्ण संधी मानावयास हवी. भाषेची समृद्धी ही तिच्या सुपुत्रांच्या कर्तबगारीवर देखिल ठरत असते.
म्हणून वेबिनार, ई कॉन्फरंसिंग, ब्लॉगर्स झोन, वेबकास्ट, नेट्वर्किंग अशा विविध माध्यमांतून हे संमेलन आगळेवेगळे ठरेल असे प्रयत्न करावयास हवे.

एखादे संमेलन परदेशी गेले तर बिघडले कोठे?
“उत्तर धृवावर संमेलन घ्या” म्हणणे केवळ हास्यास्पद आहे. दूर राहील्याने मराठी बद्दलचे प्रेम काकणभर अधिकच असेल असा विश्वास बाळगावयास हवा.

मराठी संमेलन फक्त महाराष्ट्रातच व्हायला हवे असा काही कायदा नाही!

कृपया आपली मते नोंदवा. मुख्यतः ते अधिक लोकाभिमुख आणि हाय टेक कसं हॊईल यावर आपली मते स्वागतार्ह आहेत!
(म्हणजे कुणी ते विचारात घेतील अथवा नाही हा वेगळा प्रश्न आहे!)....पण आपण विचार करायला काय हरकत आहे?

Tuesday, April 29, 2008

शाळा - मिलींद बोकील

नुकतंच मिलिंद बोकील यांचं 'शाळा' पुस्तक वाचलं...काय सुरेख वर्णन आहे! त्यांच्या भाषेत सांगायचं तर...सरस!

नववीतील काही मुलं,जी एका जणाच्या शाळेच्या वाटेवर असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या अर्धवट इमारतीत जमून येणार्‍या जाणार्‍यांची छेड काढत असतात, त्यांचे संवाद, भाषा, भिती....
शिरोडकर ला भेटायसाठी त्याने टाकलेली पावलं...तिचं बारकाईने केलेलं वर्णन...
घरची कडक शिस्त, आणि 'सु‍र्‍या' चे भानगडबाज, बेफ़िकीर विश्व यात चाललेली त्याची ओढाताण..त्यातून 'शिरोड्कर' विषयी वाटणारे प्रेम-आकर्षण....खूप तरलतेने, प्रवाहीपणे, मार्दवाने लिहीले आहे.


१२ ते १५ या पौगंडावस्थेतिल मुलांचे विश्व, त्यांचे भावनिक चढ उतार, त्यांची भाषा, समजूती...अतिशय सुरेख रितीने चित्रीत केले आहे.

"मी थोड्यावेळ तसाच सुममध्ये बसून राहीलो....सुममध्ये बसलं की मुलींना कुणी पाहतंय हे कळत नाही...".....अशी भारी वाक्यं...

खरंच शाळेत गेलेल्या प्रत्येकाने वाचायला हवे असे पुस्तक आहे. म्हणजे बरंच नॉस्टॅलजिक व्हायला होतं! खूप साधर्म्य स्थळे आढळतात.
विशेषतः कॅंप चे वर्णन तर अगदी सरस उतरले आहे. आणि भाषेचा फ़्लो तर किती उत्तम! कुठे म्हणून अडखळायला होत नाही.


आता मिलींद बोकील यांना 'शिरोडकर' च्या बाजूने पुस्तक लिहा अशी विनंती करायला हवी.

Friday, April 18, 2008

लेखना मागची प्रेरणा

आपण का लिहीतो......
मेघनाने हा प्रश्न विचारला तिच्या खो खो च्या खेळात, तेव्हा पासून विचार करतेय... का लिहावसं वाटतं आपल्याला?
ही ऊर्मी तशी फार आधीपासूनचीच...कॉलेज च्या वार्षिकांकातले लेखन, त्याही आधी निबंध स्पर्धांमध्ये मिळवलेली बक्षिसं, गझलांची विश्लेषणं आणि मैत्रिणींना भरभरून लिहीलेली पत्रं...पावसाच्या धारांबरोबर लिहीलेल्या अनेक कविता..पण मग हातातून धागा सुटत जावा तशी हीही सुटत गेली कधीतरी...परवा परवा ब्लॉग सापडेपर्यंत...

काय असते ती ऊर्मी? मनातल्या भावना, विचार अधिकाधिक समर्पकतेने व्यक्त करता यावेत ही असोशी? की भाषेच्या लालीत्यपूर्ण अलंकारांचा साज चढविण्याचा निव्वळ अट्टाहास? की आपल्याला जे वाटते ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचा खटाटोप?

काही असो...लेखन आनंद देते मात्र. निखळ. काही सुचत नसते तेव्हा थोडी हूरहूरही! कुणाचे उद्देश निरनिराळे असू शकतात, पण मला तर ते फक्त माझ्या स्वतः च्या आनंदासाठी मीच लावलले एक झाड आहे असे वाटते. आणि लेखन म्हणजे तरी काय...वाचनाचे पडलेले प्रतिबिंबच ना? खूपदा तर मला सुंदर काही वाचायला मिळालं की त्याची दाद देण्यासाठी लिहावसं वाटतं! लोक इतकं देखणं लोभावणारं कसं काय लिहू शकतात?

इतकी समृद्ध आपली मराठी, तिचे इतके झळाळते पैलू आणि तिला लाभलेले अनेक गुणवंत लेखक व कवी..किती आनंद आहे आयुष्यात!

मनातून लडी उलगडत जातात.. एकावर एक.., शब्दांचा साज लेवून कविता पुढ्यात ठाकते... निर्मीतीचा आनंद तरी याहून वेगळा काय असतो?

कुणासाठी म्हणून नसतेच ती अनिवार ऊर्मी ... ते फक्त जीवनाच्या एखाद्या भावलेल्या रंगाचे व्यक्त रुप असते...रंग कोणताही असो...दुःखाचा, आनंदाचा, उल्हासाचा...लिहून झाल्यावर मिळणार्‍या तृप्तीतच तिचे सार्थक असते.

Wednesday, April 09, 2008

जी ए - प्रतिभेचे दुसरे नाव

आत्ता जी एं चं "हिरवे रावे" पुन्हा एकदा वाचलं. किती अप्रतिम शब्दकळा, किती पॉवर आहे त्यांच्या लेखनात हे पुन्हा एकदा पटलं...स्वतःलाच!

छोटीशीच वाक्यं...पण सारा संदर्भ सामावलेला...अतिशय अर्थगर्भ, पूर्ण!

मला सगळ्यात आवडते ती कथा म्हणजे "बाधा"...मन सुन्न करणारा अनुभव...विषण्णता अशी दाटत जाते मनभर...

फक्त जाणीवेच्या अलवार पातळीवर असणारी प्रेमाची एक अबोध, हुरहुरती भावना मनाशी जपणारी त्यातली रमा, तिचे भाबडे विश्व, मनातून कधी ओठांवरही न आलेल्या तिच्या इच्छा, मनाची अनाकलनीय आंदोलनं आणि त्यातून तिचा डोहाच्या खोल पात्रात निसटत गेलेला प्रवास..
सगळेच विलक्षण सामर्थ्याने, सुंदरतेने पाकळी पाकळी विस्तारावी तसे फुलवत नेणारे जी एंचे लेखन...अहा!

साहित्यातले नोबेल मिळावे अशा त्यांच्या कथा आहेत... इतकी सजग, तरल अनुभूती असणारा आणि वाचकांनाही स्वतः बरोबर ती देणारा लेखक ..विरळा आणि म्हणूनच श्रेष्ठही.

त्यांच्या प्रतिभेला त्रिवार कुर्निसात!